चंद्रपूर: महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भाग सध्या प्रचंड उष्णतेच्या विळख्यात सापडले आहेत. विशेषतः चंद्रपूर शहराने सोमवारी तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून जगातील सर्वांत उष्ण शहर ठरण्याचा विक्रम केला. याआधी रविवारीही चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाधिक होते. भारतात नव्हे तर संपूर्ण जगात एप्रिल महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद ही गंभीर बाब मानली जात आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्याच्या काळात योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चंद्रपूरचा तापमानाचा आकडा धोक्याची घंटा ठरू शकतो. कारण सोमवारच्या दिवशी चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश, ब्रह्मपुरीचे 45 अंश, अमरावतीचे 44.6 अंश, तर अकोल्याचे 44.1 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. ही सर्वच शहरे विदर्भातील आहेत आणि यामुळे संपूर्ण भागात सूर्याचा प्रकोप जाणवतो आहे. हवेत वाढलेली गरमी, कोरडे हवामान आणि वातावरणात उष्णतेची झळ यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. लोकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला पालिकांकडून देण्यात येतो आहे.
अगदी जागतिक स्तरावर पाहिल्यास, जगातील सर्वांत उष्ण 15 शहरांपैकी 11 शहरे ही भारतातील आहेत, यावरून आपल्या देशात वाढत चाललेल्या उष्णतेचे प्रमाण स्पष्ट होते. चंद्रपूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर झारसुगुडा (45.4°C), तिसऱ्या स्थानावर ब्रह्मपुरी (45°C), पाचवे अमरावती (44.6°C) आणि बाराव्या क्रमांकावर अकोला (44.1°C) या भारतातीलच शहरांची नोंद आहे. तसेच यादीत सिधी (44.6°C), राजनांदगाव (44.5°C), प्रयागराज व धूपुर (44.3°C), खजुराहो (44.2°C), आदिलाबाद (43.8°C) आणि रायपूर (43.7°C) यांचा समावेश आहे. हे आकडे तापमानवाढीची आणि हवामानातील असंतुलनाची ठळक खूण मानले जात आहेत.
या उष्णतेच्या लाटेचा परिणाम शेती क्षेत्रावरही दिसून येत आहे. शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी देणे, खुरपणी करून तण नियंत्रण करणे, तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरपायरीफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे, असे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. ही फवारणी करताना पावसाचा अंदाज पाहून योग्य वेळ निवडावी, असाही सल्ला देण्यात आला आहे.