मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानाचा विचित्र खेळ सुरू झाला आहे. एका बाजूला प्रचंड उष्णता नागरिकांना हैराण करत असताना, दुसऱ्या बाजूला काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने 6 मे रोजी राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. या भागांमध्ये तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून, आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. सकाळपासूनच उष्णतेचा तडाखा जाणवत असून दुपारच्या सुमारास अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. पुण्यात कमाल तापमान सुमारे 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान तापमान 22 अंशांच्या आसपास राहील. दुपारी वाहणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या ठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो. जरी तापमानात मोठी घट अपेक्षित नसली, तरी काही वेळासाठी उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.
सोलापूर जिल्ह्यातही वातावरणात बदल दिसून येत आहे. दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. नांदेडमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र येथे कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये तापमान 38 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील. विदर्भात विशेषतः नागपूरमध्ये उष्णतेचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.