मुंबई: गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात प्रचंड उष्णता आणि दमट हवामान जाणवत होते. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये नागरिकांना असह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार,7 मेपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. यासोबतच आयएमडीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
मुंबईसह परिसरात हवामान विभागाने 5 मे रोजी ढगाळ वातावरण आणि काही भागात संध्याकाळी हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक ठरेल. सकाळी किंवा संध्याकाळी गडगडाटी पावसाच्या शक्यतेमुळे काही वेळेची वाहतूक विस्कळीत होण्याचीही शक्यता आहे.
राज्यातील इतर भागांमध्येही हवामान बदलत आहे. पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई, रायगड आणि ठाणे येथे ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, तर बीड, चंद्रपूर आणि विदर्भातील काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. मात्र कोल्हापूर, रत्नागिरी, जालना, सोलापूर, बीड आणि सिंधुदुर्ग यांसारख्या भागांमध्ये कोरडे हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.
या पावसामागे नैऋत्य राजस्थानवर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रणालीचा प्रभाव असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण तमिळनाडू येथे आर्द्रतेत वाढ झाली आहे आणि हवामानात बदल होत आहेत. या प्रणालीमुळे राज्यात काही ठिकाणी हवामान अधिक दमट आणि अस्थिर झाले आहे, ज्यामुळे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयएमडी मुंबई येथील हवामानशास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, 'पश्चिम विक्षोभामुळे वातावरणात ओलाव्याची चळवळ होते, ज्यामुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. जरी हा पाऊस पूर्ण आर्द्रता कमी करत नाही, तरी नागरिकांना उकाड्यातून काहीसा आराम मिळतो.' त्यामुळे नागरिकांनी या हवामान बदलाची दखल घेत योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सध्या कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 7 मेपर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात आणि शक्यतो बाहेर पडताना छत्री, पाण्याची बाटली आणि आवश्यक ती काळजी घ्यावी. अचानक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनीही पीक संरक्षणाची उपाययोजना करून ठेवणे आवश्यक आहे.