बुलढाणा : जगभरात आपल्या अनोख्या रचनेमुळे प्रसिद्ध असलेलं लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं हे सरोवर आजपर्यंत आपल्या खाऱ्या आणि अल्कधर्मी पाण्यामुळे ‘जीवसृष्टीविरहित सरोवर’ म्हणून ओळखलं जात होतं. इथलं पाणी इतकं क्षारीय आहे की, त्यात कोणतंही जिवंत प्राणी किंवा वनस्पती जगू शकत नाहीत, असं शास्त्रज्ञांचं स्पष्ट मत होतं. पण आता इथे काहीतरी बदल घडताना दिसत आहे. ज्यामुळे पर्यावरण प्रेमींसोबतच सगळ्यांच टेंशन वाढल आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात अतिवृष्टी झाल्याने सरोवराची पातळी विक्रमी वाढली आहे. लोणार शहरातील सांडपाणी सरोवरात मिसळू नये म्हणून NEERI संस्थेने उभारलेला प्रकल्प निष्क्रिय झाल्याने, आता हे सांडपाणी थेट सरोवरात मिसळत असल्याचं समोर आलं आहे. या प्रक्रियेमुळे सरोवरातील पाण्याची रासायनिक रचना बदलू लागल्याचं तज्ञ सांगतात. यामुळे अल्कधर्मी पाण्याचा समतोल बिघडू लागला असून, जैविक बदल घडण्याची शक्यता वाढली आहे.
हेही वाचा: CERT-In Warning: लाखो अँड्रॉइड युजर्सवर मोठं संकट! 'हे' अपडेट लगेच करा नाहीतर वाढेल धोका
याच बदलांचं सर्वात धक्कादायक रूप म्हणजे सरोवरात मासे दिसू लागले आहेत! होय, इतिहासात पहिल्यांदाच या जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे आढळले आहेत. या घटनेनं संशोधक, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सरोवराच्या पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने ही सजीव सृष्टी निर्माण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो. पण या ‘जीवसृष्टीचा जन्म’ ही निसर्गाची देणगी आहे की मानवी हस्तक्षेपाचा परिणाम हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.
तज्ज्ञांचा इशारा मात्र गंभीर आहे “जर हा बदल असाच सुरू राहिला, तर लोणार सरोवराचं अस्तित्वच धोक्यात येईल.” आता प्रश्न फक्त एवढाच नाही की हे सरोवर वाचेल का, तर आपण निसर्गाशी केलेल्या प्रत्येक छोट्या दुर्लक्षाची किंमत किती मोठी असू शकते हे समजून घेण्याची वेळ आली आहे. लोणार सरोवर हे केवळ भूगर्भीय आश्चर्य नाही, ते पृथ्वीच्या सहनशीलतेचं प्रतीक आहे.
हेही वाचा: Haq Movie: सामान्य स्त्रीच्या स्वाभिमानाचा 'हक्क' मोठ्या पडद्यावर; शाह बानो नेमकी होती तरी कोण?