मुंबई : राज्यभरात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज, प्रचार आणि युती आघाड्यांबाबत चर्चांना उधाण आले असतानाच, महायुतीतील घटक पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेत्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र असल्याचे सांगितले जात असताना, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपवर थेट टीका केली आहे. “भाजपवाले कधी कुणाशी युती करतील, हे सांगता येत नाही,” असे विधान करत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भरत गोगावले यांनी सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. “कर्जत, खालापूर वगळता आम्ही कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढवत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महायुतीतील समन्वयाबाबत शंका उपस्थित होत आहेत.
हेही वाचा: Sambhajinagar Crime : मैत्रिणीनेच केला विश्वासघात, कपडे बदलतानाचा व्हिडीओ चित्रित केला आणि...; छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक प्रकार उघड
ते पुढे म्हणाले की, वरच्या पातळीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी निवडणुका एकत्र लढवाव्यात, असे आदेश असले तरी स्थानिक पातळीवर नेत्यांमधील मतभेदांमुळे ते शक्य होत नाही. स्थानिक राजकारणातील तणाव आणि समीकरणांमुळे युती अडचणीत येत असल्याचे त्यांनी सूचित केले.
“स्थानिक नेते वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळतात की नाही, हे आम्हालाही माहिती नाही,” अशी टीका करत भरत गोगावले यांनी थेट भाजपवर बोट ठेवले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, या विधानाला आता स्पष्ट राजकीय वळण प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची वक्तव्ये समोर येत असल्याने, आगामी काळात महायुतीतील एकजूट कितपत टिकून राहते, आणि स्थानिक पातळीवरील युती आघाड्यांचे चित्र कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Bangladesh Attack on Hindu : धक्कादायक! बांगलादेशात पुन्हा एका हिंदू तरुणाला संपवलं, झोपेत असतानाच पेट्रोल ओतून जीवंत जाळलं अन्...