Thursday, May 22, 2025 05:32:25 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : 17वर्षांनंतर सुनावणी संपली, लवकरच येणार निकाल

2008 मालेगाव स्फोट प्रकरणातील सुनावणी 17 वर्षांनंतर पूर्ण; 6 मृत, 100 हून अधिक जखमी. एनआयए न्यायालयात सुनावणी संपली असून, अंतिम निकाल 8 मे 2025 रोजी जाहीर होणार.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण  17वर्षांनंतर सुनावणी संपली लवकरच येणार निकाल

मुंबई : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील सुनावणी अखेर तब्बल 17 वर्षांनंतर पूर्ण झाली आहे. विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) न्यायालयाने या प्रकरणात शनिवारी सुनावणी पूर्ण करत निकाल राखून ठेवला असून, 8 मे 2025 रोजी अंतिम निर्णय घोषित होणार आहे. या स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते.

ही घटना मालेगावच्या मशिदीच्या परिसरात घडली होती. एका मोटरसायकलवर स्फोटकं ठेवून ती मशिदीबाहेर उभी करण्यात आली होती. नमाज संपल्यानंतर मोठी गर्दी रस्त्यावर येत असताना या स्फोटात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे देशभरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केला होता. मात्र, 2011 मध्ये या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आली. 2016 मध्ये एनआयएने आपला आरोपपत्र दाखल करत प्रज्ञा ठाकूर, श्याम साहू, प्रवीण तकलकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना क्लीन चिट दिली होती. एनआयएच्या म्हणण्यानुसार, या चौघांविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्याची शिफारस करण्यात आली होती.

हेही वाचा: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका

न्यायालयाने त्यानुसार साहू, तकलकी आणि कलसांगरा यांना दोषमुक्त केले, मात्र प्रज्ञा ठाकूर यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले. 30 ऑक्टोबर 2018 रोजी विशेष एनआयए न्यायालयाने सात आरोपींविरुद्ध UAPA व IPC अंतर्गत आरोप निश्चित केले. या सात आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञा ठाकूर, मेजर रमेश उपाध्याय (नि.), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.

या आरोपींवर UAPA अंतर्गत कलम 16 (दहशतवादी कृत्य), 18 (दहशतवादी कट रचणे) तसेच IPC अंतर्गत कलम 302(खून), 307(खुनाचा प्रयत्न), 120(बी) (षड्यंत्र रचणे), 153(अ) (धर्माधारित तेढ वाढवणे) आणि 324(जखमी करणे) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

या खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, त्यापैकी 34 साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली. साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सप्टेंबर 2023 मध्ये पूर्ण झाली. शनिवारी सरकारी वकिलांनी आपला अंतिम लेखी युक्तिवाद सादर केला. त्यानंतर न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी निकाल राखून ठेवत तो 8 मे 2025 रोजी जाहीर होईल, असे स्पष्ट केले.

या बहुचर्चित खटल्याकडे देशभरातून लक्ष लागून राहिले आहे. निकालाच्या दिवशी या प्रकरणात मोठा टप्पा गाठला जाणार असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री