Manoj Jarange against Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले वादळ आता नव्या वळणावर येताना दिसत आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, राज्यातील वाद आणि दूषित वातावरण निर्माण होण्यामागे छगन भुजबळ यांचा हात असून, त्यांना पाठिंबा देणारे व्यक्ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
जरांगे यांचे म्हणणे आहे की, छगन भुजबळ हे फक्त पदासाठी काम करणारे नेते आहेत. त्यांंना मंत्रिपद मिळाल्यानंतर इतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण राबवले जात आहे. भुजबळ यांना उभे करून वाद निर्माण करणे, मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करणे हे सर्व फडणवीसांचे राजकीय डावपेच असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. फडणवीस सध्या आपली राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी काही नेत्यांना पुढे करून समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे त्यांचे मत आहे.
हेही वाचा: 'ठाकरे गटाची 60 ते 70 टक्के मतं फतव्यातून येतात'; दीपक केसरकरांचा टोला
ओबीसींच्या जनगणनेबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, अनेक ओबीसी नेते जनगणनेची मागणी करत आहेत, परंतु छगन भुजबळ हे फक्त श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. त्यांना ओबीसी समाजाचा कुठलाही प्रत्यक्ष फायदा करून देता आलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाज या दोघांनीही भुजबळ यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात छगन भुजबळ यांची भूमिका कायमच द्विधा राहिलेली आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि सरकारच्या निर्णय प्रक्रियेलाही अडथळा निर्माण होतो. जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी काळात हे आरोप कोणती नवी दिशा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी ओबीसी आणि मराठा समाजाला एकत्र येऊन शांतीपूर्ण मार्गाने हक्कांची लढाई लढण्याचे आवाहन केले. फूट टाकणाऱ्या नेत्यांपासून दूर राहा आणि समाजहितासाठी एकसंघ रहा, असा संदेशही त्यांनी दिला.
राज्यातील सामाजिक समरसतेला धक्का पोहोचवणाऱ्या राजकीय खेळीवर आता जनतेनेच विचार करायला हवा, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.