Saturday, May 17, 2025 09:43:18 PM

सासू आणि नणंदेकडून विवाहितेचा छळ; पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

मासिक पाळीमध्ये स्वयंपाक न केल्यामुळे सासू आणि नणंदेने विवाहितेचा छळ केला. त्यामुळे, विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

सासू आणि नणंदेकडून विवाहितेचा छळ पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

जळगाव: सासू आणि सून यामधील भांडणाचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असाल. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव येथे घडली आहे. मासिक पाळीमध्ये स्वयंपाक न केल्यामुळे सासू आणि नणंदेने विवाहितेचा छळ केला. त्यामुळे, विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या किनोद गावात राहणाऱ्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, असा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. तपासादरम्यान, विवाहितेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या आहेत. 'ही आत्महत्या नसून सासू आणि नणंद यांनीच माझ्या बहिणीचा गळा दाबून तिचा खून केला आहे', असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.

सासरच्यांकडून विवाहितेचा छळ:  
या मृत महिलेचे नाव गायत्री कोळी असून गेल्या काही महिन्यांपासून तिच्या माहेरच्यांकडून सतत पैश्याची मागणी केली जात होती. त्यासोबतच, शुल्लक कारणांवरून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप केला जात आहे. गायत्रीच्या मृत्यूनंतर, तिच्या माहेरच्यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात, पैशाच्या त्रासातून गायत्रीला मानसिक त्रास दिला जात होता, असा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.

हेही वाचा: सरकारनं पीओके ताब्यात घ्यावं; असदुद्दीन ओवैसींचा हल्लाबोल 

गळफास घेऊन विवाहितेने केली आत्महत्या:  
जळगावच्या चोपडा तालुक्यातील माहेर असलेल्या गायत्री कोळी या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू समोर आला आहे. आपल्या बहिणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेत असल्याची माहिती मिळताच गायत्रीचा भाऊ आणि मावशी यांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. तपासादरम्यान, गायत्रीच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळल्यामुळे, 'सासू आणि नणंद या दोघींनीच तिला जीवे मारले आहे', असा आरोप गायत्रीच्या भावाने आणि मावशीने केला आहे.

सासरच्यांकडून विवाहितेचा मानसिक छळ:  
मृत गायत्रीच्या भावाने, सागर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांपासून माहेरून पैसे आणण्यावरून सासरी गायत्रीचा छळ होत होता. किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाणदेखील केली जात होती. अशातच, मासिक पाळी आल्यामुळे सासरच्या लोकांनी तिने केलेला स्वयंपाक खाण्यास नकार दिला. त्यामुळे, तिच्या सासू आणि नणंद यांनी आपल्या बहिणीला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला तसेच मारहाण केली. यामुळे आपल्या बहिणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली', असा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर, मृत गायत्री कोळीच्या सासरच्या लोकांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री