रत्नागिरी: मंगळवारी, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर, मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'कोणत्याही दुकानदाराकडून कोणत्याही प्रकारची वस्तू घेण्यापूर्वी हिंदूंनी त्यांचा धर्म विचारायला पाहिजे'. पुढे त्यांनी म्हटले की, 'जर दुकानदाराला हनुमान चालीसा येत नसेल, तर त्यांच्याकडून अजिबात सामान खरेदी करू नका', हे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून विविध प्रश्न निर्माण होत आहेत.
नुकताच, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात झालेल्या एका जाहीर सभेत मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'जर त्यांनी मारण्यापूर्वी आपला धर्म विचारला असेल, तर हिंदूंनीही कोणतीही वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला पाहिजे. त्यासोबतच, हिंदू संघटनांनीही अशी मागणी केली पाहिजे'.
हेही वाचा: 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; काश्मिरातून आतापर्यंत 800 पर्यटक परतले
दुकानदारांना हनुमान चालीसा म्हणायला लावा
या जाहीर सभेदरम्यान मंत्री नितेश राणे म्हणाले की, 'काही दुकानदार आपला धर्म सांगणार नाहीत अशी परिस्थितीही निर्माण होईल. तर तुम्ही त्यांना हनुमान चालीसा म्हणायला लावा. जर त्यांना हनुमान चालीसा म्हणता येत नसेल, तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊ नका', असं देखील त्यांनी आश्चर्यकारक विधान केलं आहे.
दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला लावला
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे पर्यटकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिली, त्यांनी माहिती दिली की, 'हल्लेखोरांनी काही पर्यटकांना कलमा म्हणायला लावले. ज्यांनी ते करू शकले नाही, त्यांची गोळी मारून हत्या केली'. या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.