मुंबई: 'ठाकरे गट आणि मनसेत युतीची चर्चा नाही. भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा', मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'शिवसेना ठाकरे गट आणि मनसेत कोणतीही युती नाही आणि चर्चा नाही. त्यामुळे भोंगा वाजवणाऱ्यांनी प्रस्ताव द्यावा', संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
'रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवत आहे? आम्ही वाजवत आहोत की ते वाजवत आहेत? जे भोंगा वाजवत आहेत त्यांनी प्रस्ताव द्यावा', असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, 'आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. मनसे पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून मी तुम्हाला सांगतो'.
'संदेश कशाला? मी बातमीच देईन' - उद्धव ठाकरे:
जेव्हा एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना, 'मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल?' असा प्रश्न विचारला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, 'संदेश कशाला? मी तुम्हाला बातमीच देईन. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ'.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार'. सध्या महाराष्ट्राच्या मनात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असेच आहे. 'भविष्यात हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?' अशी जोरदार चर्चाही सुरू आहे आणि असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.