Thursday, May 22, 2025 09:21:33 PM

मातृत्वाला काळिमा फासणारी गोष्ट; आईने नवजात चिमुकलीची केली निर्घृण हत्या

पालघरमध्ये मुलगी जन्माला आल्याने आईनेच आपल्या दोन दिवसांच्या मुलीची निर्घृण हत्या केली. समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेमुळे ही अमानुष घटना घडली.

 मातृत्वाला काळिमा फासणारी गोष्ट आईने नवजात चिमुकलीची केली निर्घृण हत्या 

पालघर : मुलगी जन्माला आल्याने आईनेच आपल्या दोन दिवसांच्या नवजात मुलीची नाकतोंड दाबून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात उघडकीस आली आहे. डहाणूतील लोणीपाडा परिसरात ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनम शहा (वय 30) ही महिला आपल्या माहेरी डहाणू येथे आली होती. ती मूळची कोलकात्याची असून, नुकताच तिने आपल्या चौथ्या बाळाला जन्म दिला होता. मात्र पुन्हा एकदा मुलगीच झाल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेच्या पगड्याखाली दबलेल्या या महिलेसाठी चौथं अपत्यही मुलगीच असणं नकोसं ठरलं.

दोन दिवसांच्या चिमुकलीला जगण्याची संधीही न देता, पुनमने तिची नाक व तोंड दाबून श्वास घोटला. ही कृती केवळ क्रूरच नाही तर माणुसकीलाही काळिमा फासणारी आहे. ही घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आणि याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा:वाळूज मध्ये उसन्या पैश्यातून निर्माण झाला वाद ;किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण करून बलात्काराची धमकी

डहाणू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आईला अटक केली आहे. सद्यस्थितीत अधिक तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात श्वास रोखून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे सरकार मुली वाचवा, मुली शिकवा सारख्या मोहिमा राबवत आहे, तर दुसरीकडे समाजातील काही भाग अजूनही मुलींना नकोसं मानत आहेत, हे अशा घटनांमधून दिसून येत आहे. समाजात अजूनही मुलगा हवा ही मानसिकता बळकट आहे. या विचारांमुळे महिलांवरही घरच्यांकडून दबाव येतो आणि त्या टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एका नवजात जीवाचा घेतलेला बळी क्षम्य नाही.

पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपीने हे कृत्य एकटीने केले की कोणाच्या सांगण्यावरून, याचा शोध घेतला जात आहे. ही घटना केवळ आईच्या क्रौर्याचे नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या अपयशाचे दर्शन घडवते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि समाजप्रबोधन दोन्ही तितकंच गरजेचं आहे.
 


सम्बन्धित सामग्री