Neelam Gorhe On Uddhav Thackeray: विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गट शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि स्वभावावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रचंड राग साठलेला असून, त्या रागातूनच ते वैयक्तिक टीका करत आहेत. हा राग शांत करण्यासाठी त्यांनी एकदा 'गंगास्नान' करावे, असा खोचक सल्ला गोऱ्हे यांनी दिला आहे.
'उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळच द्यायचे नाहीत'
उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकदा वेळ मागूनही ती मिळत नसे. "आम्ही 58 आमदार होतो, पण महत्त्वाच्या निर्णयांच्या बैठकींना आम्हाला बोलावले जात नसे. ठराविक मंत्र्यांसोबत बैठक होऊन निर्णय जाहीर व्हायचे. अनेकदा सरकारी अधिकारी काय निर्णय घेत आहेत, हेच आम्हाला कळत नसे," अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांना गृहीत धरले जात होते आणि त्यांना योग्य महत्त्व दिले जात नव्हते, असा आरोपही त्यांनी केला.
महिला आघाडीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
नाशिकमधील शिवसेना महिला आघाडीच्या राजीनाम्यांचा संदर्भ देत गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. "नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांनी 'मातोश्री'वर येऊन आपली व्यथा मांडली होती. तिथल्या काही मध्यस्थांनी या महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. तरीही उद्धव साहेबांनी किंवा इतर कोणीही त्या महिलांची समजूत काढली नाही. 50-60 लोक पक्ष सोडून जात असतानाही जर आत्मपरीक्षण होत नसेल, तर पक्षात माणसांची किंमत उरली आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - Sunetra Pawar First Reaction: 'मनावर दुःखाचा डोंगर, पण दादांचा वारसा...'; शपथविधीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली भावूक पोस्ट
'मंत्रिपदाची संधी डावलल्याचे दुःख'
स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, 2014 मध्ये जेव्हा युतीचे सरकार आले, तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळेल अशी खात्री होती. "माझा परफॉर्मन्स चांगला असूनही मला संधी दिली गेली नाही, तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. डावलले जाण्याचे दुःख काय असते, हे मी अनुभवले आहे. मात्र, मी रुसून न बसता वैधानिक कामात स्वतःला झोकून दिले," असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्षमतेचे कौतुक
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या वेगाचे नीलम गोऱ्हे यांनी कौतुक केलं. शिंदे यांच्यासोबत काम करताना एक मोकळेपणा जाणवतो, असे त्या म्हणाल्या. विशेषतः 'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्यातील महिलांचा शासनावर विश्वास वाढला असून, केवळ 1500 रुपयांचा प्रश्न नसून महिलांचा आत्मविश्वास वाढणे ही महत्त्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.