नागपूर: औद्योगिक प्रगतीचा गजर करणाऱ्या कळमेश्वर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी पहाटे मृत्यूचा भीषण स्फोट घडला आणि काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेली कामाची शिफ्ट शोकांतिकेत बदलली. सोलर इंडस्ट्रीज (SBL) या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. अनेक जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कारखान्यात नियमित उत्पादन प्रक्रिया सुरू असतानाच अचानक भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारखान्याची मुख्य इमारत अक्षरशः जमीनदोस्त झाली, तर आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर वेढून टाकला. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारखान्याचे लोखंडी अवशेष आणि साहित्य तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
स्फोटानंतर इमारतीचा मोठा भाग कोसळल्याने काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, स्थानिक प्रशासन तसेच कंपनीचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ढिगारा हटवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून जखमींना तात्काळ नागपूरमधील विविध रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
हेही वाचा: Israel vs Iran War: पश्चिम आशियात महायुद्धाचा वणवा; इस्रायल, अमेरिका, इराण पाठोपाठ आता 'या' देशाची एन्ट्री
या दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “अपघात सांगून येत नाही, पण निष्काळजीपणा मात्र त्याला निमंत्रण देतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक आणि कामगारांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे. सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात येत असून कंपनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी संबोधत प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह NDRF, SDRF, PESO आणि DISSH यांची विशेष पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्याला गती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या दुर्घटनेत 18 जण जखमी झाले असून सर्वांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली.
फॅक्टरीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबियांना देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. औद्योगिक विकासाच्या शर्यतीत मानवी जीविताची किंमत दुर्लक्षित होता कामा नये, हा कटू धडा या दुर्घटनेने पुन्हा अधोरेखित केला आहे. सुरक्षितता ही केवळ कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे, अन्यथा प्रगतीची किंमत जीव गमावून चुकवावी लागते, ही वस्तुस्थिती या भीषण स्फोटाने पुन्हा समोर आणली आहे.
हेही वाचा: Strait of Hormuz Crisis: जगाची ऊर्जा लाइफलाइन धोक्यात! इराणच्या कठोर पावलाने तेलबाजारात खळबळ, दर गगनाला भिडणार?