नागपूर: आगामी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पुन्हा एकदा आंदोलकांच्या गर्दीने भरून जाणार आहे. लोकशाही पद्धतीने होणारी आंदोलने हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य मानले जाते आणि यंदाही राज्यातील विविध भागांतून हजारो नागरिक आपल्या मागण्यांसाठी नागपूरकडे रवाना होत आहेत. अधिवेशनाचा कालावधी अवघा आठ दिवसांचा असला तरी पहिल्याच दिवशी मोर्चे, धरणे, उपोषणे अशा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आंदोलनांची नोंद होणार आहे.
8 डिसेंबरपासून अधिवेशनाची अधिकृत सुरुवात होत आहे. त्याचबरोबर शहरात मोर्चेकरींची मोठी गर्दी अपेक्षित असून पोलिसांनीही कडक बंदोबस्ताची तयारी केली आहे. कष्टकरी संघटना, सामाजिक संस्था आणि काही राजकीय पक्षांनी आंदोलनांसाठी पोलिस आयुक्तालयाकडे परवानगी मागितली आहे. यापैकी तीन मोठे मोर्चे आणि एक साखळी उपोषणाची मागणी विविध राजकीय संघटनांकडून करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच चार मोर्चे, 15 धरणे आणि नऊ उपोषण आंदोलनांची नोंद होणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Winter Session: मिलिंद साठे महाधिवक्ता, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा; हिवाळी अधिवेशनाआधी सरकारचे दोन मोठे निर्णय
या मोर्चांमुळे हिवाळी अधिवेशनातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापेल, अशी शक्यता आहे. संपूर्ण अधिवेशन काळात तब्बल 32 मोर्चे, 20 धरणे आणि 16 उपोषणे होणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या वर्षीचे अधिवेशनही नेहमीप्रमाणे वादळी ठरणार हे निश्चित मानले जात आहे. पहिल्या दिवशी जे मोर्चे शहरात धडकणार आहेत, त्यामध्ये शैक्षणिक न्याय, दिव्यांग शाळांना 100 टक्के अनुदान, दिंडोरा प्रकल्पग्रस्तांना भरपाई पॅकेज आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभ वाढविण्याच्या मागण्या अग्रस्थानी आहेत.
राज्यभरातील विविध भागांतून या प्रश्नांवर आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने नागपुरात पोहोचणार आहेत. याशिवाय अनेक संघटना धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. सामाजिक न्याय, रोजगार, आरक्षण, आर्थिक अडचणी आणि शासकीय धोरणांमुळे नाराज असलेल्या संस्थांनी आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, दोन आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गडचिरोलीतील देवेंद्र ब्राह्मणवाडे यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. तर राजेंद्र मिश्रा यांनी भुमाफिया विरोधात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून पोलिसांनी यशवंत स्टेडियम परिसरात विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.
अधिवेशनाचा पहिला दिवस संघर्षमय आणि गजबजलेला राहणार असून नागपूरमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून नागरिक आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडतील, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. सरकारसमोर विविध क्षेत्रांतील प्रश्नांचा भडिमार होणार असून पुढील आठ दिवस नागपूरचे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Soyabean Rate Increase: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! सोयाबीनला बाजारात मोठी दरवाढ