Nashik-Akkalkot Highway: उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी 'नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोर'च्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. सूरत-चेन्नई मार्गात बदल करून साकारण्यात येणारा हा 374 किलोमीटर लांबीचा महामार्ग पुढील 2 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने' (NHAI) ठेवले आहे. नाशिक जिल्ह्यातील 107 हेक्टरहून अधिक जमीन संपादनासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
प्रशासनाकडून 21 दिवसांची मुदत
या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांकडून प्रशासनाने हरकती व सूचना मागवल्या आहेत. यासाठी 21 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून, या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
कसा असेल हा नवा महामार्ग?
एकूण लांबी: 374 किलोमीटर.
प्रवास: नाशिक (आडगाव) पासून सुरू होऊन अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूरमार्गे थेट अक्कलकोटला जोडला जाईल.
पायाभूत सुविधा: या मार्गावर 27 मोठे पूल आणि 164 लहान पुलांचे जाळे असणार आहे.
फायदा: शेतकरी, उद्योजक आणि पर्यटकांना दक्षिण भारताशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
मार्गात बदल का झाला?
सुरुवातीला हा मार्ग 'सूरत ते चेन्नई' असा 1200 km चा प्रस्तावित होता. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध आणि तांत्रिक कारणांमुळे केंद्र सरकारने यात बदल केला. आता हा मार्ग नाशिकच्या आडगावपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा - Balumama Temple: अदमापूरला दर्शनाला जाणार आहात? बाळूमामा मंदिर 'या' तारखांना बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण
तुमच्या गावातून रस्ता जाणार का?
नाशिक जिल्ह्यातील 3 तालुक्यांमधील 30 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे:
नाशिक तालुका: आडगाव, विंचूरगवळी.
निफाड तालुका: दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपानी, तळवाले.
सिन्नर तालुका: देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी, कहांडलवाडी.