नाशिक: काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये व्यापारी निखिल दर्याणी यांच्या अपहरणाने शहरात खळबळ उडाली होती. आता या अपहरण प्रकरणाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. पोलिस तपासात हे उघडकीस आलंय की, निखिल दर्याणी यांच्या अपहरणातून मिळवण्यात आलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा दगडफेक प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी होणार होता.
दर्याणी यांचं 4 एप्रिल रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. यातील 15 लाख रुपये अपहरणकर्त्यांना देण्यात आले होते. हेच पैसे दगडफेकीच्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी वापरण्याची योजना आखण्यात आली होती, ही गंभीर गोष्ट पोलिस तपासातून समोर आली आहे.
हेही वाचा :द्वेष हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणंही योग्य नाही; मोहन भागवत यांचं पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
या प्रकरणातील मुख्य संशयित शाकीर पठाण सध्या फरार आहे, तर त्याचा भाऊ समीर पठाण पोलिसांच्या ताब्यात आहे. समीर पठाण उर्फ छोटा पठाण हा कुख्यात 'टिप्पर गँग'चा म्होरक्या असून त्याचं नाव आधीपासून अनेक गुन्ह्यांत आलेलं आहे.
इंदिरानगर परिसरात समीर पठाणने सुरु केलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला. पेरुची बाग परिसरातील एका शेतात एअर कुलरसह आरामदायक व्यवस्था असलेल्या या अड्ड्यातून तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम, पाच कार, एक रिक्षा, 15 दुचाकी, मोबाईल आणि जुगार साहित्याचा समावेश आहे. या छाप्यात समीर पठाणसह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काठे गल्लीतील सातपीर दर्ग्याजवळ अतिक्रमण काढण्याच्या वेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत समीर पठाणचा थेट सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या घटनेत अनेक सराईत गुन्हेगार सहभागी होते, हेही तपासात स्पष्ट झालं आहे.
सध्या फरार असलेला शाकीर पठाण हा या सर्व कारस्थानाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. व्यापाऱ्याचं अपहरण, खंडणी, गुन्हेगारांना जामीन मिळवून देणं आणि जुगार अड्डा या सर्व गोष्टींचा एकमेकांशी थेट संबंध असल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे.