Gulabrao Patil On Sanjay Raut: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून विविध मुद्द्यांना स्पर्श केला. प्रारंभी त्यांनी उपस्थित जनतेस दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि हा सण नेहमी संकटांवर विजय मिळवण्याचा संदेश देतो, असे सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सध्या शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक संकटांचा उल्लेख केला. तथापी, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच ज्यांना या लोकांनी आयुष्यभर त्रास दिला त्या राज ठाकरेंना आता आय लव्ह यू म्हणत आहेत, अशी खोचक टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली.
हेही वाचा - Ramdas Kadam On Uddhav Thackeray : 'बाळासाहेब ठाकरेंचा आधीच मृत्यू, मृतदेह घरात ठेवून...', रामदास कदम यांचा मोठा खुलासा
दरम्यान, मराठवाड्यात मदत पोहोचवण्यावरून शिंदे गटावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, त्यांच्या शिवसैनिकांचा उद्देश नेहमीच समाजसेवा राहिला आहे. यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वाचा उल्लेख करून, शिंदे हे त्याच मार्गावर चालत असल्याचे सांगितले. ईर्ष्यावाडी दुर्घटनेच्या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री असूनही जीव धोक्यात घालून लोकांसाठी धाव घेतली, हे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा -Dasara Melava 2025: आदित्य ठाकरेंचे फोटो सॅनिटरी पॅडवर...; तुम्ही हेच संस्कार दिलेत का? ज्योती वाघमारे यांचा रश्मी ठाकरेंना सवाल
दरम्यान, भाषणाच्या शेवटी मात्र गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना माईक नसेल तर जणू काही चुडेल अंगावर येते. संजय राऊत हा लग्न लावणारा भटजी आहे. परंतु, यांनी ज्याची ज्याची लग्न लावली त्यांची लग्न तुटलेली आहेत, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली. दसरा मेळाव्यातील या भाषणामुळे गुलाबराव पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शेतकरी प्रश्न, शिंदे यांचे कार्य आणि विरोधकांवरील हल्ला या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली.