ZP Elections 2026: राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता ग्रामीण भागातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले असतानाच राज्याच्या राजकारणात एका नव्या पक्षाची जोरदार एन्ट्री झाली आहे. ‘ओबीसी बहुजन आघाडी’ या नव्या राजकीय पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करत या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओबीसी बहुजन आघाडी राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. ग्रामीण भागात ओबीसी समाजाला राजकीय व्यासपीठ मिळावं, हाच या पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
सध्या अनेक ठिकाणी पारंपरिक पक्षांमध्ये उमेदवारीवरून असंतोष पाहायला मिळतो आहे. इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळण्यासाठी मोठी धडपड करावी लागत असल्याची तक्रार अनेकांकडून केली जाते. याच पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन आघाडीने थेट कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा दावा केल्याने ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. पक्षात येणाऱ्या इच्छुकांनी संपर्क साधल्यास त्यांना उमेदवारीसाठी आवश्यक एबी फॉर्म थेट घरपोच देण्यात येतील, असा दावा देखील करण्यात आला आहे.
प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच ओबीसी समाजासाठी स्वतंत्रपणे कार्य करणारा पक्ष ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मोठ्या प्रमाणात उतरतो आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणं आणि त्यांचा उमेदवारीचा प्रश्न कायमचा सोडवणं, हा पक्षाचा प्रमुख अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशा वेळी नव्या पक्षाची एन्ट्री, थेट उमेदवारीची ऑफर आणि घरपोच एबी फॉर्मसारखे दावे यामुळे राजकीय गणितं बदलणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी बहुजन आघाडी आगामी निवडणुकांमध्ये कितपत प्रभाव टाकते, हे निकालानंतरच स्पष्ट होणार असलं, तरी सध्या तरी या घोषणेमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.