पंढरपूर: पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिरात आता मोबाईल फोन वापरण्यावर कडक बंदी घालण्यात आली असून, सर्व मंदिर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंदिर प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठीही काही नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांनी मंदिरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना केवळ व्हीआयपी गेटचा वापर करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कोणत्याही संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
याशिवाय, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही आता काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांच्या वस्तूंची तपासणी, शरीर तपासणी तसेच संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. मंदिर परिसरात तसेच मुख्य रस्त्यांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा:अनंतनागमध्ये दहशतवादविरोधी कारवाया तीव्र; 175 संशयित ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धार्मिक स्थळांवर विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची अतिरिक्त व्यवस्था करावी, अधिक काटेकोर तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या सूचनांनुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने त्वरीत निर्णय घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत.
यासंदर्भात माहिती देताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. तपासणीबरोबरच इतर सुरक्षाविषयक बाबतीतही पूर्ण दक्षता बाळगली जात आहे. कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ला या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटनस्थळांवर सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले गेले आहेत. पहलगामसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, सर्वच धार्मिक स्थळांवर विशेष सतर्कता बाळगली जात आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनानेही अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षाव्यवस्था उभी केली आहे.