काश्मीरच्या शांत डोंगरदऱ्यांमध्ये पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये अलीकडेच घडलेला दहशतवादी हल्ला संपूर्ण देशाला हादरवून गेला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन परिसरात 6 अतिरेक्यांनी अचानक गोळीबार करत पर्यटकांना लक्ष्य केले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात काही विदेशी पर्यटकांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या हल्ल्याने काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून गेलेले पर्यटक त्या वेळी हल्ल्याच्या ठिकाणी जवळपास होते, पण काही मिनिटांच्या फरकाने ते थोडक्यात वाचले. अमरावतीमधील 11 जण गोळीबाराच्या क्षणांपूर्वी बैसरनहून निघाले होते. हे सर्व सध्या श्रीनगरमधील ‘हॉटेल डेव्हलिप लँड’मध्ये सुरक्षित आहेत. त्यामध्ये मंगला बोडके, छाया देशमुख, निता उमेकर, चंदा लांडे आणि सारिका चौधरी यांचा समावेश आहे.
हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील क्रूर दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर
चाळीसगाव: याचवेळी चाळीसगाव येथील भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष देवयानी ठाकरे या त्यांच्या 14 सहकाऱ्यांसह काश्मीरमध्ये अडकल्या आहेत. त्यांचाही श्रीनगरमधील एका सुरक्षित ठिकाणी मुक्काम असून, 25 एप्रिलला ते परतणार आहेत. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण संपर्कात आहेत आणि योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
जळगाव: जळगावच्या शिव कॉलनीतील नेहा वाघुळदे या त्यांच्या मैत्रिणींसोबत 16 एप्रिलपासून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी त्या हल्ल्याच्या ठिकाणाहून काही अंतरावर होत्या. त्यांच्या पती तुषार वाघुळदे यांनी सांगितलं की, नेहा यांना सैन्य दलाने तत्काळ सुरक्षित स्थळी हलवलं. सध्या त्या व्हॉट्सॲप मेसेजच्या माध्यमातून संपर्कात असून 28 एप्रिलला परत येणार आहेत.
हेही वाचा: पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, आम्हालाही मारा; पहलगामच्या डोंगरात घडलेला थरार समोर
बुलढाणा: जिल्ह्यातून काश्मीरला गेलेल्या 5 जणांनाही हल्ल्याच्या वेळी थांबविण्यात आलं आणि त्यामुळे ते थोडक्यात वाचले. हॉटेल मालकाने त्यांना फायरिंग सुरू असल्याची कल्पना दिली, त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. या पाच जणांमध्ये अरुण जैन यांचे भाऊ, वहिनी आणि तीन मुले यांचा समावेश आहे. सध्या ते हॉटेलमध्ये सुरक्षित असून परिवाराला दिलासा मिळाला आहे.
या भीषण घटनेनंतर केंद्र व राज्य सरकारने अधिक सुरक्षा व्यवस्था राबवण्याचे आदेश दिले आहेत. काश्मीरच्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात पुन्हा एकदा हिंसेचे सावट पसरले आहे. तरीही, सर्व नागरिकांनी संयम बाळगून सुरक्षिततेच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन स्थानिक प्रशासनाने केलं आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.