मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्याची दखल घेऊन राज्य सरकारने मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण 6 जणांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांचे पार्थिव मुंबईत विमानतळावर आणले
श्रीनगरमध्ये शिवसेनेचे मदत पथक दाखल झाले आहे. राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. शिवसेनेचे मदत पथक मंगळवारी रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे.