बीड: वारकरी संस्थानामधील विद्यार्थ्यांच्या पालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. प्रवेश रद्द करत पैसे परत मागितल्याने मारहाण करण्यात आली आहे. बीडजवळील तपोभूमी येथील ही घटना आहे. संबंधित पालकाकडून सत्यवान महाराज साठे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. मात्र सत्यवान महाराज साठे यांनी आरोप नाकारले आहेत.
बीड जवळच्या तपोभूमी संस्थांवर वारकरी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या मुलाच्या पालकाला मारहाण झाल्याची घटना घडली. मनोहर वारे उर्फ कचरु वारे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या मुलाला या वारकरी संस्थेमध्ये प्रवेश मिळावा याकरिता तीस हजार रुपये भरले होते. परंतु काही कारणास्तव त्याला ही प्रवेश प्रक्रिया रद्द करायची असल्याने त्याने दिलेले पैसे परत मागितले. यावरून वाद झाल्याने त्या ठिकाणच्या इतर पाच जणांनी वारे यांना काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या अंगावर अक्षरशः व्रण उमटले आहेत. या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सत्यवान महाराज लाटे यांनी सांगितले असून या सर्व प्रकारामागे इतर दोन महाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हेही वाचा : भिवंडीतील कामवारी नदीत बुडून दोन भावांचा मृत्यू
'मला जीव जाईपर्यंत मारहाण केली'
पैसे मागण्यासाठी गेल्यावर मला जीव जाईपर्यंत मारहाण केली. महाराज जर असे कृत्य करत असतील तर आम्ही कोणाच्या भरवशावर आमची मूल पाठवायची असा सवाल कचरु वारे यांंनी केली. तसेच महाराजांना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी कचरु यांना खूप वेदना झाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
'कचरु यांनी शिवीगाळ केली'
सत्यावान महाराज लाटे यांनी कचरु वारे यांना मारहाण केली नसल्याचे सांगितले. तसेच कचरु यांनी आमच्याकडे येऊन शिवीगाळ केली असा आरोपही लाटे महाराजांनी कचरु वारे यांच्यावर केला. आम्ही बाल गोपालांना शिकवतो. त्यामुळे आम्ही असे कृत्य करु शकत नाही. वारे या ठिकाणी आले आणि माझं तुम्ही काहीही वाकडं करु शकत नाही, माझ्या पाठीशी उत्तराधिकारी आहेत असे म्हणाले. यावरुन त्यांच्या मागे संभाजी महाराज आणि कुमार महाराज ठोसर आहेत, असं दिसत आहे.