मुंबई: महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अजित पवार हे जनतेचे नेते होते आणि तळागाळातील लोकांशी त्यांचा चांगला संपर्क होता, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“अजित पवार हे मेहनती आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव अग्रभागी राहणारे नेते होते. प्रशासन विषयक त्यांची सखोल जाण तसेच गरीब आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी असलेली त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे,” अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच त्यांच्या असंख्य समर्थकांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करत, “ॐ शांती” अशी श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून घडेलल्या घटनेची माहिती घेतली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेतृत्व ; अजित पवार यांनी सहा वेळा भूषवले उपमुख्यमंत्रीपद