Raj Thackeray: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली, तर शुक्रवारी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या लागोपाठच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले, तरी राज ठाकरेंनी स्वतः या भेटींमागचे मूळ कारण स्पष्ट केले आहे.
राजकीय नव्हे, 'नागरी' प्रश्नांसाठी धाव
नेत्यांच्या भेटीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणुका संपल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. शहराचा विकास होत असताना नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईसह पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नवे उड्डाणपूल आणि रस्ते होत असले तरी पार्किंगच्या नियोजनाअभावी सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी नमूद केलं. अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा नाही, या तांत्रिक विषयावर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा - Vaibhav Naik vs Deepak Kesarkar: 'या मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचाच आमदार निवडून येईल'; वैभव नाईक यांचे दीपक केसरकरांना खुले आव्हान
संजय राऊतांचा घणाघात; 'नंदनवन बेईमानीतून निर्माण झालंय'
दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर विचारले असता, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत टीका केली. राऊत म्हणाले की, 'कोण कोणाला भेटतंय यावर आमचे लक्ष नाही, पण एकनाथ शिंदे ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून जे सत्तासुख मिळवले आहे, ते बेईमानीतून आलेले नंदनवन आहे.'