नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे नागरी सन्मान सोहळ्यात कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील शेखर कपूर आणि पंकज केशुभाई उधास (मरणोत्तर) यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी मुंबई येथे जन्मलेले अमेरिकन नागरिक प्रा. नितीन नोहरिया यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
राष्ट्रपतींनी राज्यातील अरुंधती भट्टाचार्य (व्यापार आणि उद्योग), वासुदेव तारानाथ कामथ (कला), डॉ. जसपिंदर नरुला कौल (कला), पं. रोणू मजुमदार (कला) आणि चैतराम देवचंद पवार (सामाजिक कार्य) यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
पुरस्कार विजेत्यांच्या जीवन आणि कार्याविषयीची थोडक्यात माहिती:
शेखर कपूर
शेखर कपूर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते सध्या आयसीएईडब्ल्यूमध्ये फेलो आहेत. भारतात आणि परदेशात भारतीय चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी ख्याती मिळवली आहे. त्यांनी त्यांच्या 'एलिझाबेथ' या चित्रपटाद्वारे आणि त्यानंतरच्या चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांद्वारे पाश्चिमात्य ठिकाणीही आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे चित्रपट समाजाला अनेक अर्थपूर्ण संदेश देतात. याव्यतिरिक्त, त्यांनी चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे अध्यक्ष म्हणून काही काळ काम करून समाजाची आणि त्यांच्या व्यवसायाची परतफेड केली आहे आणि सध्या ते भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक आहेत. कपूर यांना त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पंकज केशुभाई उधास (मरणोत्तर)
भारताचा मखमली आवाज म्हणून ओळखले जाणारे पंकज केशुभाई उधास हे केवळ गझल गायक नव्हते तर एक सांगीतिक वस्तुपाठ आणि परंपरा आणि आधुनिकतेमधील दुवा होते. 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे जन्मलेले उधास हे काव्य आणि सुरांनी भरलेल्या घरात वाढले. जरी त्यांना औपचारिक शास्त्रीय शिक्षण मिळाले नसले तरी, संगीताबद्दलच्या त्यांच्या समर्पणाने आणि आवडीने त्यांना त्यांच्या काळातील सर्वात आदरणीय आवाजांपैकी एक बनवले. 1986 च्या 'नाम' चित्रपटातील 'चिठ्ठी आयी है' या गाण्याने त्यांचा भाग्योदय झाला. हे गाणे जगभरातील लाखो चाहत्यांना आजही भावते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी घुंगरू टूट गये, और अहिस्ता किजीये बातें आणि जीये तो जीये कैसे सारखी कालातीत लक्षवेधी गाणी दिली, ज्यात प्रत्येक गाणे गझलची गहनता आणि भावना टिपते. उधास यांचा प्रभाव सीमापार भारतीय संगीताला जागतिक उंचीवर घेऊन गेला. 2022 मध्ये, त्यांनी त्यांचा शेवटचा गझल अल्बम, फॉरएव्हर गालिब, सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये प्रदर्शित केला, ज्यामुळे त्यांची शाश्वत लोकप्रियता आणि वारसा पुन्हा सिद्ध झाला. संगीताच्या जगात त्यांचे योगदान अतुलनीय होते आणि त्यांनी गझलची परंपरा जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : 'जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी'
अरुंधती भट्टाचार्य
अरुंधती भट्टाचार्य या भारतीय वित्तीय सेवा क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्ती आहेत आणि सध्या त्या सेल्सफोर्स दक्षिण आशियाच्या अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम करतात. परिवर्तनकारी नेतृत्वासाठी बहुतेकांना परिचित असणाऱ्या त्यांनी भारतीय बँकिंग आणि तंत्रज्ञान उद्योग क्षेत्राला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे केवळ भारताची आर्थिक परिसंस्थाच बळकट झाली नाही तर समावेशक विकासाचा अवलंब करण्यास चालना देखील मिळाली आहे. 18 मार्च 1956 रोजी जन्मलेल्या भट्टाचार्य यांनी सेंट झेवियर्स स्कूल (बोकारो स्टील सिटी) मधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर कोलकात्यातील लेडी ब्रेबॉर्न कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली आणि जाधवपूर विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. 1977 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये परिवीक्षाधीन अधिकारी म्हणून रुजू होऊन त्यांनी आपल्या गौरवशाली कारकिर्दीची सुरुवात केली आणि एक एक पायरी वर चढत 210 वर्षे जुन्या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला बनल्या. भट्टाचार्य यांच्या अनुकरणीय योगदानाची दखल अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी घेण्यात आली आहे. फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिला आणि फॉर्च्यूनच्या "50 महान नेत्यां" मध्ये त्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांना अनेक संस्थांनी "बिझनेस लीडर ऑफ द इयर" पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.
वासुदेव तारानाथ कामथ
वासुदेव तारानाथ कामथ हे प्रख्यात चित्रकार आहेत. 27 एप्रिल 1956 रोजी कर्नाटकातील करकला येथे जन्मलेल्या कामथ यांनी मुंबईतील प्रसिद्ध सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्ट (ड्रॉइंग अँड पेंटिंग) पदवी विशेष प्राविण्य आणि सुवर्णपदकासह पूर्ण केली. वासुदेव कामथ यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. काही प्रतिष्ठित पुरस्कारात 1977 चा वार्षिक कला प्रदर्शनात 'सुवर्ण पदक', सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट 1977 उषा देशमुख 'सुवर्ण पदक' 1982 बॉम्बे आर्ट सोसायटीचा 'सुवर्ण पदक', 1991 ला 31 वा सर्वोत्तम प्रवेशिका- राज्य कला प्रदर्शन महाराष्ट्र, 2006 द ड्रेपर ग्रँड प्राइज, पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका, 2019 मध्ये सर्वोत्तम प्रवेशिकेसाठी 60 वा राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार, 2021मध्ये मध्यप्रदेशचा 'कालिदास सन्मान' पुरस्कार यांचा समावेश आहे.
डॉ. जसपिंदर नरुला कौल
डॉ. जसपिंदर नरुला कौल या एक प्रसिद्ध बॉलीवूड पार्श्वगायिका आहेत, ज्यांना 'प्यार तो होना ही था' चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या "प्यार तो होना ही था" गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली, तसेच त्यासाठी त्यांना 1999 चा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्कार आणि स्टार स्क्रीन सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला. डॉ. नरुला यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1966 रोजी एका सांगीतिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील एस. केसर सिंग नरुला हे पंजाबी चित्रपट आणि संगीत उद्योगातील एक प्रसिद्ध संगीतकार होते आणि त्यांची आई मोहिनी नरुला या एक प्रसिद्ध पंजाबी आणि हरियाणवी लोक गायिका होत्या. त्यांच्या वडिलांव्यतिरिक्त, पं. सीता रामजी आणि रामपूर सहस्वान घराण्याचे गुलाम सादिक खान साहिब हे त्यांचे गुरू होते. डॉ. नरुला यांची कारकीर्द अगदी लहान वयातच सुरू झाली जेव्हा त्यांना एक अद्भुत बालिका म्हणून ओळखले गेले आणि 1974 मध्ये त्यांचा पहिला परदेशातील गायन दौरा यूके आणि कॅनडामधील कार्यक्रमांनी सुरू झाला. त्यानंतर त्या जगभरात प्रवास करत राहिल्या आणि त्यांच्या मधुर आवाजाने आणि हृदयस्पर्शी गाण्यांनी कोट्यवधी संगीत प्रेमींना आनंद देत राहिल्या. 1975 मध्ये एचएमव्ही (हिज मॅटर्स व्हॉइस) ने त्यांच्या भक्तिगीतांचा पहिला सुपर 7 रेकॉर्ड प्रसिद्ध केला. डॉ. नरुला यांना 1999 मध्ये फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे: सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक: "प्यार तो होना ही था"; प्यार तो होना ही था या चित्रपटातील गीतासाठी 1999 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड: सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायन, 'धूम मचा दे' साठी एनडीटीव्ही इमेजिंग पुरस्कार: एनडीटीव्ही इमॅजिनवरील ख्यातनाम गायकांची स्पर्धा. अल्बर्टा, कॅनडा, उझबेकिस्तानच्या सिल्व्हर निंगेल येथील विधानसभेत आणि अमेरिका, यूके, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, उत्तर आफ्रिका, पूर्व आफ्रिका, मॉरिशस, न्यूझीलंड, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, बांगलादेश, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, त्रिनिनाद आणि टोबॅगो, सुरीनाम इत्यादी देशातील अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.
हेही वाचा : बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग; अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
पंडित रोणू मजुमदार
पंडित रोणू मजुमदार हे भारतातील एक प्रसिद्ध बासरीवादक आहेत ज्यांना या कालखंडातील जगभरातील तरुण पिढीमध्ये भारतीय बासरी (बांसुरी) लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. या युगातील भारतीय बासरी वादनात त्यांना सर्वात आदरणीय नाव मानले जाते. बासरीवादनाच्या बाबतीत, ते एक शैलीकार आहेत आणि त्यांनी राग सादर करण्याची एक अनोखी शैली शोधून काढली आहे, ज्यामध्ये द्रुपद गायकी आणि लयकारी यांचा सुरेल मिलाफ आहे. 28 जुलै 1965 रोजी जन्म झालेल्या पंडित मजुमदार यांनी त्यांचे वडील डॉ. भानू मजुमदार, दिवंगत पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले आणि शेवटी आदरणीय पंडित विजय राघव राव यांच्या मार्गदर्शनाखाली बासरी वाजवण्यास सुरुवात केली. महान गुरू पंडित रविशंकर यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याचे भाग्य त्यांना लाभले. एक शक्तिशाली कलाकार म्हणून, त्यांना मैहर घराण्याचा वारसा लाभला आहे. त्यांनी 1996 मध्ये ग्रॅमी नामांकनाने त्यांनी समकालीन लोकप्रिय संगीत क्षेत्रात स्वतःसाठी एक हेवा वाटावा असे स्थान निर्माण केले आहे. पंडित मजुमदार यांनी 'वेणू नाद' नावाच्या एका मंचावर 5,378 बासरीवादकांचा संगीत कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जात आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी ग्वाल्हेर येथील तानसेन महोत्सवात त्यांची 'समवेद' ही रचना वाजवण्यात आली तेव्हा त्यांचा आणखी एक विश्वविक्रम झाला. ते 'लार्जेस्ट हिंदुस्तानी क्लासिकल बँड'चे संगीतकार आणि प्रमुख होते जिथे 546 सहभागींनी एकत्रितपणे विविध वाद्ये वाजवली. या बँडची नोंद अलीकडेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यांनी भारतातील पहिल्या आय-मॅक्स चित्रपट "मिस्टिक इंडिया" साठी संगीत दिले आहे. पंडित मजुमदार यांना त्यांच्या जगभरातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कामगिरीसाठी अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
चैत्राम देवचंद पवार
चैत्राम देवचंद पवार हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आहेत जे आदिवासी कल्याण आणि पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. 1 जून 1967 रोजी महाराष्ट्रातील बारीपाडा जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जन्मलेले पवार यांनी 1993 मध्ये पुणे विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ते आदिवासी पार्श्वभूमीचे आहेत आणि गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी आदिवासी विकास, सक्षमीकरण, स्वावलंबन, वन हक्क, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शेती आणि शाश्वत विकास इत्यादी विविध मुद्द्यांवर वनवासी जमातींसोबत काम केले आहे. पवार यांनी त्यांच्या गावातून वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने काम सुरू केले, ज्याचा विस्तार आता महाराष्ट्र आणि गुजरातमधील 100 गावांमध्ये झाला आहे. ते वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधत आहेत. जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा लाभ उदयोन्मुख आदिवासी युवा नेत्यांना सक्षम बनवण्यात होईल. आदिवासी गावांमध्ये नेतृत्व विकासाच्या या मॉडेलमधील मार्गदर्शक तत्वे पश्चिम घाटातील आदिवासींसोबत काम करणाऱ्या इतर संस्थांनी अंगिकारली आहेत. पवार यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास उपक्रम (यूएनडीपी) कडून जैवविविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने त्यांना 2013 मध्ये शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, 2014 मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार आणि 2024 मध्ये महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार प्रदान केले. त्यांना संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, वसंत राव नाईक सामाजिक पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
नितीन नोहरिया
नितीन नोहरिया हे हार्वर्ड विद्यापीठाचे गणमान्य सेवा प्राध्यापक आहेत आणि जॉर्ज एफ. बेकर च्या व्यवसाय प्रशासनाचे कनिष्ठ प्राध्यापक आहेत. एक विदवत्ताप्रचुर आणि अग्रणी म्हणून त्यांनी 2010 ते 2020 पर्यंत हार्वर्ड बिझनेस स्कूलचे 10 वे अधिष्ठाता म्हणून काम केले, शाळेच्या जागतिक प्रतिष्ठेमध्ये आणि प्रभावात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नेतृत्व आणि संघटनात्मक वर्तनातील विचारवंत म्हणून, त्यांच्या संशोधनाने सीईओ प्रभावीपणा आणि कॉर्पोरेट कामगिरीच्या आकलनाला नवा आयाम दिला आहे. त्यांचे कार्य पुढल्या पिढीतील नेत्यांना घडवण्याचे आणि समाजात व्यवसायाची भूमिका पुन्हा परिभाषित करण्याचे काम करत आहे. नोहरिया यांना व्यवसाय शिक्षण आणि नेतृत्वातील योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.