Tuesday, May 20, 2025 03:09:11 PM

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवत, महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला हवं असं मत व्यक्त केल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आडनावाला एक वेगळीच राजकीय ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या वाटेने चालले असले, तरी त्यांचं एकत्र येणं ही चर्चा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिलेलं सूचक आणि थेट विधान.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत राज ठाकरेंना जेव्हा  तुम्ही आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येऊ शकता का? असा थेट प्रश्न विचारला, तेव्हा राज म्हणाले, विषय एकत्र येण्याचा नाही, इच्छेचा आहे. महाराष्ट्राचं हित जपणं हे महत्त्वाचं आहे. आमच्यातली भांडणं फार मोठी नाहीत. मी तयार आहे, पण त्यांची तयारी आहे का?

या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत सोबत राहून भाजपविरोधी भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या दोघांचा राजकीय वेगळेपणा स्पष्ट दिसतो. पण तरीही, राज ठाकरे यांनी आपली द्वेष नसलेली भूमिका मांडल्यामुळे त्यांच्या नात्यात एक प्रकारचा मोकळेपणा जाणवतो.

पाण्यासाठी चिमुरडीचा बळी; जलजीवन योजनेतील अपयशावर रोहिणी खडसे संतप्त

मात्र, याआधी अनेकदा राज आणि उद्धव यांच्यातील तणाव चर्चेत राहिला आहे. 2006 मध्ये मनसे स्थापन झाल्यापासून ठाकरे घराण्यातील राजकीय दुरावा अधिक वाढला. मात्र, गेल्या काही वर्षांत दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक टीका टाळलेली आहे. विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र मंचावर दिसल्यामुळे, त्यांच्या संबंधांमध्ये काहीसा उबदारपणा असल्याचंही पाहायला मिळालं.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, काही नेत्यांनी खासगीत हे विधान नवीन राजकीय खेळी म्हणून पाहिलं असल्याची चर्चा आहे.राज ठाकरे यांच्या या विधानामधून ते स्पष्ट संकेत देत आहेत की, महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक टप्प्यावर आहे. आणि जर महाराष्ट्राच्या हितासाठी काही निर्णय घ्यावा लागला, तर व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी त्यांची आहे.

आता सर्वांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या पुढील भूमिकेकडे लागलं आहे. ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग निवडला, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतात. मात्र ते शक्य होईल का? की ही चर्चाच सीमित राहील? हे पाहणं रंजक ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री