मुंबई: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीरच्या डोंगररांगांमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार करत अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतला. या अमानवी कृत्यामुळे देशभरात भीतीचं आणि दुखःद वातावरण आहे. मृतांची संख्या वाढत असून, अनेक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. 'हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांचं थरकं बसलं पाहिजे,' असे ते म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावरून सरकारला आवाहन केलं की आता वेळ आली आहे की दहशतीला जोरदार प्रत्युत्तर द्यावं. मनसे सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी अपडेट समोर
राज ठाकरेंची X पोस्ट जशीच्या तशी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली...
ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील.
हेही वाचा: पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, आम्हालाही मारा; पहलगामच्या डोंगरात घडलेला थरार समोर
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा... १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला... यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत... केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली... एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला... ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ... या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे...
केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी....
हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.
राज ठाकरे ।