Tuesday, May 20, 2025 03:26:21 PM

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा; 11 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण

राजकोट किल्ल्यावर 83 फूट उंच नव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण 11 मे रोजी होणार असून, या सोहळ्यास राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा 11 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण

सिंधुदुर्ग: कोकणातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा भाग असलेल्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण येत्या 11 मे रोजी मोठ्या थाटात होणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच अनेक मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे.

या पुतळ्याची उभारणी ही शिवप्रेमींना अभिमान वाटावा अशी असून, 83 फूट उंचीचा पूर्णाकृती शिवरायांचा तलवारधारी पुतळा राजकोट किल्ल्यावर उभा करण्यात आला आहे. हा पुतळा अत्यंत भव्य आणि दर्जेदार आहे. राम क्रिएशन आर्ट या संस्थेच्या शिल्पकार राम सुतार यांच्याकडे याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुतळा घडविण्यात आला आहे.

याआधी 4 डिसेंबर 2024 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र 26 ऑगस्ट 2024 रोजी त्या पुतळ्यासोबत दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याची दखल घेत राज्य शासनाने पुन्हा नव्याने पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी अधिक बळकट आणि कलात्मक स्वरूपात हा पुतळा घडविण्यात आला आहे.

हेही वाचा: 40°C तापमानातून सुटका हवीयं? मग चला थंड महाराष्ट्रात..

या पुतळ्याचे अनावरण सोहळा राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि मालवण या भागातील पर्यटनासाठी हा पुतळा एक नवीन ओळख ठरणार असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. किल्ला, समुद्रकिनारा आणि आता शिवरायांचा पुतळा या त्रिकूटामुळे मालवणचे पर्यटनक्षेत्र आणखी बहरणार आहे.

शिवरायांचा इतिहास, पराक्रम, आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या भव्य पुतळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला आहे, तसेच राजकोट किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.

11 मे 2025 रोजी होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला हजारो शिवभक्त आणि पर्यटक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण कोकण सज्ज आहे.
 


सम्बन्धित सामग्री