रत्नागिरी जिल्हा परिषद इतिहास आणि पार्श्वभूमी-
जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गट आणि ९ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कोकणच्या राजकारणात या परिषदेचा दबदबा नेहमीच राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. सुरुवातीला सिंधुदुर्ग हा रत्नागिरीचाच भाग होता,मात्र १९८१ मध्ये सिंधुदुर्ग वेगळा झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र सध्याच्या ९ तालुक्यांपुरते मर्यादित झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर असे नऊ तालुके आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे, सह्याद्रीच्या रांगा आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या पट्ट्यात विस्तारलेला हा जिल्हा दुर्गम डोंगराळ भाग आणि समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १५३७ गावे आणि ८४५ ग्रामपंचायती आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या
संपूर्ण राज्यासह रत्नागिरी जिल्हा परिषद व नऊ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यातील एकूण ५६ जिल्हा परिषद गट व ११२ पंचायत समिती गणांसाठी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १६,१५,०६९ इतकी आहे. यात ८,५३,९४८ पुरुष लोकसंख्या आहे तर ७,६१,१२१ महिला लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे सुमारे १०,७५,००० पेक्षा जास्त म्हणजेच ६६.६% लोक ग्रामीण भागात राहतात तर ३३.४% लोक नागरी भागात राहतात. यात साक्षरता ८२.१७% आहे, वैशिष्ट्य म्हणजे स्थलांतरामुळे रत्नागिरी जिल्ह्यात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.