मुंबई: सार्वजनिक जीवनातील धावपळ, राजकीय यश-अपयश, संघर्ष आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या या प्रवासात पत्नीची साथ महत्त्वाची असते, याची जाणीव करून देणारे मनोगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. स्वतःच्या लग्नाच्या रौप्य महोत्सवानिमित्त पत्नी सुहासी चव्हाण यांच्यासाठी त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
'ही पंचवीस वर्षांची वाटचाल एखाद्या कादंबरीतील अध्यायासारखी डोळ्यांसमोर उभी राहते,' असे म्हणत त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. खुषी आणि सलोनीच्या रूपाने आईवडील होण्याचा आनंद, राजकीय यशाचे क्षण, भावनिक चढउतार आणि जीवनातील नाट्यमय प्रसंग यांचा उल्लेख त्यांनी आपल्या संदेशात केला.


सार्वजनिक जीवनातील वेगवान प्रवासात कुटुंबासाठी वेळ देता आला नाही, याची खंत व्यक्त करताना त्यांनी पत्नी सुहासी यांच्या संयम, समर्पण आणि कुटुंबासाठी दिलेल्या नि:स्वार्थ योगदानाचे कौतुक केले. “घराचा मजबूत आधारस्तंभ बनून सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या,” अशा शब्दांत त्यांनी पत्नीबद्दलचा अभिमान व्यक्त केला.
'कदाचित हे शब्द मी कधी व्यक्त केले नसतील… पण याचा मला मनापासून अभिमान आहे,' या भावनिक ओळींमुळे ही सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रविंद्र चव्हाण आणि सुहासी चव्हाण दाम्पत्यावर विवाह रौप्य महोत्सवानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला असून, त्यांच्या या भावनिक संदेशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.