बीड: नाशिकमध्ये अलीकडेच घडलेल्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आणि तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, नाशिकमध्ये घडलेली दंगल ही कुठल्याही अपघाताने किंवा चुकून नव्हे, तर जाणीवपूर्वक घडवण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला सहकार्य दर्शवलं, मात्र काही मंडळींनी या कारवाईला विरोध करत हिंसक वळण दिलं.
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशावरून स्थानिक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली होती आणि पोलिसांनाही याबाबत कळवले होते. परंतु, काही गटांनी मुद्दामहून त्या भागात दगडफेक करत परिस्थिती तणावपूर्ण केली. यामध्ये सहभागी असणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला पाठिंबा मिळाल्याचं चित्र दिसत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काठे गल्ली सिग्नल परिसरातील रस्ता चार दिवसांपासून बंद होता. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या कारवाईदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. मात्र शहरात कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने आणि परिस्थिती नियंत्रणात आल्याने पोलिसांनी अखेर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.
तरीदेखील पोलिस प्रशासन कोणतीही ढिलाई न ठेवता सतर्क आहे. अतिक्रमण हटवलेल्या परिसरात अजूनही बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. या घटनेने शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं असलं, तरी आता परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.