अहिल्यानगर :पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, यावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान करत सांगितलं की, पवार कुटुंब एकच आहे. थोडेफार मतभेद असले तरी ते मिटवून एकत्र येणं गरजेचं आहे.
ठाकरे कुटुंब एकत्र आल्यावर आता पवार कुटुंबाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, भारतीय संस्कृती हेच सांगते की सर्वांनी एकत्र राहावं. आमची भूमिका आहे की सर्वांनी व्यक्तिगत ताकदीने एकत्र यावं. मात्र राजकीय निर्णय घेण्याची गरज पवार साहेब आणि अजित दादांनी घ्यावी. यामध्ये फक्त सुप्रिया ताईच मध्यस्थी करू शकतात आणि ते तिघंही योग्य पद्धतीने भूमिका मांडू शकतात.
चौडी येथे मंत्रीमंडळाची बैठक
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौडी येथे होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीबाबतही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, या बैठकीत कर्जत-जामखेड मधील कुकडी, सिना प्रकल्पाचे पाणी प्रश्न, विहिरी आणि इतर विकासकामांबाबत मंत्र्यांना जाब विचारणार आहोत. चौडी येथे बैठक होत असल्याचा अभिमान आहे, मात्र प्रलंबित प्रश्नांवर उत्तर मिळणं गरजेचं आहे.
पर्यटकांसाठी प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबतही रोहित पवारांनी महत्त्वाची माहिती दिली. “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी राजकारण बाजूला ठेवून अडकलेल्या पर्यटकांना राज्यात सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्वांनी मिळून हे काम करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
कर्जत नगरपंचायतीवरील टीका
कर्जत नगरपंचायतीतील एकहाती सत्ता गमावल्यावर 2 मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. “या सरकारच्या काळात लोकशाहीला किंमत राहिलेली नाही. पदाचा वापर केवळ राजकीय ताबा घेण्यासाठी, इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी केला जातो. राम शिंदे हे विकासासाठी किंवा पाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत, अशी टीका रोहित पवारांनी केली.