Monday, March 09, 2026 02:28:30 AM

Zilla Parishad School: जूनची वाट न पाहता महाराष्ट्रात मार्चपासूनच वाजणार शाळेची घंटा; चिमुरड्यांसाठी शिक्षण विभागाचा नवा मास्टरप्लॅन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 2 हजारहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग आता जून महिन्याची वाट न पाहता 9 मार्चपासूनच सुरू होणार आहेत.

zilla parishad school जूनची वाट न पाहता महाराष्ट्रात मार्चपासूनच वाजणार शाळेची घंटा चिमुरड्यांसाठी शिक्षण विभागाचा नवा मास्टरप्लॅन

Zilla Parishad School: शाळेच्या पहिल्या दिवशी रडणारी मुले आणि वर्गातील रिकामी बाके हे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी शिक्षण विभागाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे 2 हजारहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग आता जून महिन्याची वाट न पाहता 9 मार्चपासूनच सुरू होणार आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणाची गोडी लागावी, हा यामागील मुख्य हेतू आहे.

'शाळापूर्व तयारी' आता मार्चमध्येच
दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर अनेक मुले अनोळखी वातावरणामुळे शाळेत येण्यास घाबरतात. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण विभागाने 9 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीत विशेष वर्ग भरवण्याचे नियोजन केले आहे. या दोन महिन्यांत मुलांवर पुस्तकी अभ्यासाचे ओझे न टाकता, 'आनंददायी शिक्षणा'वर भर दिला जाईल. विविध खेळ, गाणी आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शाळेचा लळा लावला जाणार आहे.

उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आणि व्याप्ती
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 2090 शाळांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून शिक्षक घरोघरी जाऊन पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेतील. या विशेष वर्गांसाठी शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. उन्हाळ्यापूर्वीच मुलांना शाळेत बसण्याची सवय लागल्यास जूनमधील नियमित सत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती शंभर टक्के राहील, असा प्रशासनाचा विश्वास आहे. या मोहिमेचा फायदा जिल्ह्यातील सुमारे 16 ते 17 हजार नवीन विद्यार्थ्यांना होणार आहे.

हेही वाचा - Farm Subsidy Update: निधीअभावी 'या' योजनेला सरकारकडून ब्रेक; हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

स्वागताचा नवा 'फॉर्म्युला'
आतापर्यंत जून महिन्यात बैलगाडीतून मिरवणूक काढून किंवा फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असे. मात्र, यंदा मार्चपासूनच मुलांशी संवाद साधला गेल्यामुळे जूनमधील 'प्रवेशोत्सव' खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. मुलांना शाळेची भीती वाटण्याऐवजी तिथे जाण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी हा अडीच महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 'लहान मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, या हेतूने आम्ही जूनऐवजी मार्चपासूनच पहिलीचे वर्ग सुरू करत आहोत. 9 मार्चपासून हा उपक्रम प्रत्यक्ष सुरू होईल,' असं छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री