Tuesday, May 20, 2025 03:29:06 PM

पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण:फक्त मतांसाठी येऊ नका, पाणीटंचाई दूर करा; सरकारला नागरिकांचा सवाल

पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.

पैठणमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवणफक्त मतांसाठी येऊ नका पाणीटंचाई दूर करा सरकारला नागरिकांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पैठण तालुक्याला पाणीटंचाईची तीव्र झळ बसत असून, नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावं लागत आहे. फक्त निवडणुकीच्या वेळी आमच्या दारी येऊ नका, पाणीटंचाई दूर करा’, अशी थेट मागणी आता पैठणमधील नागरिकांनी सरकारकडे केली आहे.

जायकवाडी धरणाला मराठवाड्याची जीवनवाहिनी मानलं जातं, पण आज हेच धरण गावाशेजारी असूनही ग्रामस्थांच्या घशाला कोरडं पडले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण आज खरी उतरतेय. स्थानिक महिलांना पाण्याच्या हंड्यासाठी रोज काही किलोमीटर अंतर पार करावं लागतं. काहींना तर ६० ते ७० रुपये मोजून ड्रमभर पाणी विकत घ्यावं लागत आहे.

हेही वाचा :जालना जिल्ह्यात पुढील तीन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट; तापमान 41 अंशांवर

ग्रामस्थांच्या व्यथा

आडूळ बुद्रुक आणि आडूळ तांडा या भागांमध्ये यंदा कमी पाऊस झाल्यामुळे विहिरींनी आधीच तळ गाठला आहे. त्यामुळे इथल्या ग्रामस्थांपुढे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांना चारा देण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे एक हातात हंडा आणि दुसऱ्या हातात लहान लेकरू घेऊन महिलांना उन्हातान्हात पाण्याच्या शोधासाठी पायपीट करावी लागत आहे.एक महिला म्हणाली ,आम्हा लाडक्या बहिणींचे हाल सरकारला दिसत नाहीत का? फक्त निवडणुकीच्या वेळी आमच्याकडे लक्ष दिलं जातं. आता कोणीच विचारत नाही.आडूळ गावातील आणखी एक महिला म्हणाली , आम्ही रोज पाण्यासाठी बाहेर पडतो. पण टॅंकर वेळेवर येत नाही, पाईपलाईन नादुरुस्त आहे. प्रशासन फक्त कागदावर योजना आखतं, पण अमलात काहीच नाही.

प्रशासनाकडून केवळ आश्वासनं

ग्रामस्थांनी सांगितलं की प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणासाठी काही योजना जाहीर झाल्या होत्या. मात्र त्या फक्त फाईलमध्येच बंद आहेत. टॅंकर सेवा कधी सुरू होईल, याची माहिती कुणाकडेही नाही. त्यामुळे नागरिक ‘चातकासारखी’ सरकारची वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांचे हाल

पाण्यासोबतच चाऱ्याचाही तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विकण्याचा विचार सुरू केला आहे. ‘नाही पाणी, नाही चारा, शेती करायची कशी?’ असा सवाल अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे पैठण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

सरकारकडे ठाम मागणी

पैठणकर नागरिक आणि शेतकऱ्यांनी सरकारकडे ठाम मागणी केली आहे. आमचं दुःख ऐका, निवडणुकीपुरतं लक्ष नको. आम्हाला मूलभूत गरजांचा हक्क द्या. 


सम्बन्धित सामग्री