मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासनीस वाढत्या ताणाखाली रेल्वे प्रशासनाने एक विशेष मोहिम सुरु केली आहे. प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि अपुरी सुरक्षा यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वे नियमांकडे दुर्लक्ष करतात, अशा प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन आता अॅक्शन मोडवर आले आहे.
आता रात्री रेल्वेने प्रवास करताना देखील तिकीट असणं गरजेचं असणार आहे. रात्रीच्या प्रवासात तिकीट नसेल तर थेट कारवाई करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी ड्युटीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी सांगितले की, विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी कठोर उपाय सुरु करण्यात आलेले आहेत. जी तपासणी रात्रीच्या शेवटच्या लोकलपर्यंत तसेच सकाळच्या पहिल्या गाडीपासून सुरु राहणार आहे.
हेही वाचा- Viral Video : तुम्ही खात असलेली काकडी रासायनिक रंगातली! कलिंगड प्रकरणानंतर धक्कादायक एक व्हिडीओ समोर
पश्चिम रेल्वेवरील 1414 होत असलेल्या लोकल फेऱ्यांमुळे टीसींवर मोठा ताण येतो. त्यामुळे आता रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत चर्चगेट ते विरार मार्गावर बॅटमन नावाची स्वतंत्र पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही पथके लोकलच्या डब्यांमध्ये जाऊन प्रवाशांची तिकीट तपासणी करणार आहेत. एप्रिल महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
तर दुसरीकडे कामाचा ताण, मानसिक दबाव आणि प्रशासकीय दडपण वाढल्याची तक्रार करत सेंट्रल रेल्वे मजूर संघाने सुरक्षा व कायदेशीर मदतीची मागणी केली आहे.विरार-चर्चगेट लोकलमध्ये देखील तिकीट तपासनीसाला धक्काबुक्कीची घटना घडली आहे. घटनेमुळे तिकीट तपासनीसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तिकीट तपासनीसांना अवाजवी उद्दिष्टे (टार्गेट) देऊ नयेत. कर्तव्यादरम्यान योग्य सुरक्षा व्यवस्था मिळावी, आरपीएफकडून पूर्ण सहकार्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणात रेल्वे प्रशासनाने कायदेशीर मदत करावी अशी मागणी केली आहे.