ठाणे रेल्वे स्टेशनवर भीषण अपघात होता होता टळला आहे. शिवशाही बससेवा सुरु झाल्यापासून शिवशाही बसला आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्यंतरी या सर्व घटना कुठेतरी कमी ऐकायला मिळत असताना पुन्हा अशी एक घटना घडलेली समोर आली आहे. ठाणे स्टेशन परिसरात सॅटिस पुलावर शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले.
सदर शिवशाही बस ठाण्याहून पालघर बोईसरकडे रवाना होत होती. आगीचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी बसमध्ये पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत असून या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र बसने मोठा पेट घेतल्यामुळे बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे रेल्वे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर शिवशाही बसला भीषण आग लागल्याने घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.