Dhananjay Munde: महाराष्ट्र राज्य लोकायुक्तांनी कृषी साहित्य खरेदी प्रकरणात राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नसून सर्व खरेदी नियमांनुसारच झाली असल्याचे लोकायुक्तांनी आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, आपल्याविरोधात राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी रचल्या गेलेल्या मोठ्या षड्यंत्राचा हा पराभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयापाठोपाठ लोकायुक्तांकडूनही दिलासा
कृषी विभागाच्या मुख्यमंत्री कापूस व सोयाबीन योजनेअंतर्गत खते आणि अवजारे खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काही व्यक्तींनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण फेटाळून लावतानाच याचिकाकर्त्यांना खोटे पुरावे सादर केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता लोकायुक्तांनीही या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्याने मुंडे यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे. "ज्यांनी खोटे पुरावे देऊन हे प्रकरण 'स्कॅम' म्हणून गाजवले, त्यांचे तोंड आता या निकालामुळे बंद झाले आहे," असा निशाणा धनंजय मुंडे यांनी अंजली दमानियांचे नाव न घेता साधला आहे.
"मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न झाला"
निकालावर बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. ते म्हणाले की, "खडतर संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याचे अस्तित्व संपवण्यासाठी हे षड्यंत्र रचले गेले होते. केवळ राजकारणातूनच नव्हे, तर मला पूर्णपणे संपवण्याचा काहींचा डाव होता. मात्र, सत्य कधीही लपत नाही आणि आज पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेमुळे सत्याचा विजय झाला आहे." त्यांनी यावेळी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर झालेल्या आरोपांचा दाखला देत, विरोधकांचे एकही आरोप न्यायालयात टिकले नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा - Jayant Patil On NCP Merger: 'ज्यांच्याशी चर्चा सुरू होती, तेच आता नाहीत...'; विलीनीकरणावर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा
मीडियाच्या भूमिकेवर मांडले रोखठोक मत
यावेळी धनंजय मुंडे यांनी माध्यम क्षेत्रालाही काही प्रश्न विचारले. "एकाने आरोप केला की तो किती वेळ दाखवावा, याचा विचार व्हायला हवा. जर्नालिजममध्ये आरोपांची सत्यता तपासणेही आवश्यक आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेता असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि धनगर आरक्षणासाठी आपण केलेल्या संघर्षाची आठवण करून देत, आपण नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.