BJP Municipal Victory : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महासंग्रामाचा निकाल आज स्पष्ट झाला असून राज्याच्या राजकारणात भाजपने अभूतपूर्व 'महाविजय' संपादन केला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेतील शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता मोडीत काढत भाजपने मुंबईसह राज्यातील 21 शहरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात यश मिळाले असले तरी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
भाजपची 21 शहरांवर सत्ता
राज्यातील प्रमुख महानगरांमध्ये भाजपची लाट पाहायला मिळाली. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या 'बिग फोर' शहरांसह एकूण 21 महापालिकांवर भाजपने आपला झेंडा फडकावला आहे. यात मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, जळगांव, अहिल्यानगर (अहमदनगर), जालना, नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचा समावेश आहे.
हेही वाचा - BJP Municipal Victory: फडणवीस फॅक्टर पुन्हा कामी आला! महाराष्ट्रातील 13 महापालिकांवर भाजपची एकहाती सत्ता, विरोधकांचा सुपडा साफ
शिंदे गटाने राखली 'ठाणे-कल्याण'मध्ये सत्ता
एकनाथ शिंदे यांनी आपला प्रभाव सिद्ध करत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या दोन अत्यंत महत्त्वाच्या महापालिका आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. शिवसेना (UBT) ला या निवडणुकीत मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना केवळ परभणीमध्ये यश मिळाले असून, तिथे त्यांना काँग्रेसची साथ मिळाली आहे.
काँग्रेस आणि बविआची स्थिती
काँग्रेसला केवळ 3 ठिकाणी यश मिळाले आहे. लातूर आणि भिवंडीमध्ये स्वबळावर, तर चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. तथापी, हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने वसई-विरारमध्ये आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, विरोधकांना रोखण्यात त्यांना यश आले आहे.
हेही वाचा - BJP Win In Ichalkaranji : इचलकरंजीवर भाजपचे 'एकहाती' वर्चस्व; राज्याचा पहिला संपूर्ण निकाल जाहीर
मालेगावचा पेच, अपक्ष ठरवणार 'कारभारी'
दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेत मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. येथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या आता अपक्ष नगरसेवकांच्या हाती आहेत. अपक्षांची भूमिका मालेगावचा पुढचा महापौर कोण असेल हे ठरवणार आहे.