Gaimukh Ghat Traffic : घोडबंदर पट्ट्यातील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात यातून ठाणेकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे आहेत. घोडबंदर ते गायमुख या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रशासनाने प्राधान्याने हाती घेतले आहे. मात्र, हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) सीमेला लागून असल्याने आता वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी येथे विशेष 'एनिमल ओव्हरपास' (वन्यजीव उड्डाणपूल) उभारला जाणार आहे.
हेही वाचा - BMC Election 2026: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला बॉलिवूडची अभिनेत्री उतरली थेट मैदानात; शिवसैनिकांची अलोट गर्दी
कोंडी आणि अपघातांचे सत्र थांबणार?
सध्या घोडबंदर-गायमुख हा घाट रस्ता अरुंद आणि डांबरी असल्याने येथे अवजड वाहनांची गती मंदावते. काही दिवसांपूर्वीच गायमुख घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे तासन्तास वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने (MBMC) या मार्गाचे 60 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - BMC Election 2026: मुंबईत मोबाईलवरून 'डमी मतदाना'चा ट्रेंड व्हायरल, नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या?
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी नवा प्रस्ताव
रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वन्य प्राण्यांच्या अधिवासाला धक्का लागू नये, यासाठी वन विभागाने काही अटी घातल्या आहेत. या अटी पुढीलप्रमाणे आहेत...
ध्वनी प्रदूषणाचा फटका: वाहनांच्या आवाजामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे 'एसजीएनपी'ने स्पष्ट केले आहे.
उन्नत वन्यजीव पूल: प्राण्यांना रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये म्हणून 'एलिव्हेटेड वाईल्डलाईफ कॉरिडॉर' किंवा ओव्हरपास उभारण्याचे नियोजन आहे.
जमीन हस्तांतरण: वन जमिनीच्या वापराबाबत राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी मनपा प्रशासनाला पत्र पाठवून सुधारित आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. 'वाहतूक कोंडीमुळे केवळ मानवांनाच नाही, तर जंगलातील वन्यजीवांनाही वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यामुळे रुंदीकरण करताना पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखला जाईल, असं वन विभाग अधिकाऱ्याने म्हटलं आहे.