मुंबई : राज्यातील राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र परिषदेवर आपली ताकद वाढवण्यासाठी पक्षांनी राजकीय समीकरणे जुळवण्यास सुरूवात केली आहे. विद्यमान संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीला 8 आणि महाविकास आघाडीला एक जागा सहज मिळणे अपेक्षित आहे. तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करत असून शिवसेना शिंदे गटानेदेखील त्यांचा प्लॅन बी तयार ठेवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गट त्यांचे 10 उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी 29 मतांचा कोटा आवश्यक आहे.
हेही वाचा : Sanjay Raut: उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? संजय राऊत म्हणाले, 'योग्य वेळी पेढे मिळतील...'
विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या संख्याबळानुसार 6 जागांवर दावा केला असून यामध्ये राम सातपुते, केशव उपाध्ये, माधवी नाईक यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. तर राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच भाजप पुन्हा एकदा 'धक्कातंत्र' वापरून अनपेक्षित नावांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेकडे 57 आमदार इतके संख्याबळ असून त्यांच्या दोन जागा हमखास निवडून येणार यात शंका नाही. मात्र, नवव्या (किंवा दहाव्या) जागेसाठी उमेदवार उतरवून विरोधकांची मते फोडण्याची रणनीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यासाठी काँग्रेसच्या मतांवर डोळा ठेवण्यासोबतच, राष्ट्रवादीमधील फुटीचा फायदा घेण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, राजू वाघमारे, शायना एनसी यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा येणार असून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, झिशान सिद्दिकी किंवा समीर भुजबळ यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणाप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीत एकमत न झाल्यास या निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. ठाकरेंव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत आहेत.