Mumbai Temples: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मंगळवारी होणाऱ्या वर्षातील पहिल्या पूर्ण चंद्रग्रहणामुळे मुंबईतील धार्मिक स्थळांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. सुतक काळ आणि धार्मिक मान्यतांमुळे प्रभादेवीचे सिद्धिविनायक मंदिर, दक्षिण मुंबईची कुलदेवी मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरासह अनेक प्रसिद्ध मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी ठराविक काळ बंद राहणार आहेत.
ग्रहणाची वेळ आणि धार्मिक नियम
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, चंद्रग्रहण मंगळवारी सकाळी 6:23 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 वाजता समाप्त होईल. हिंदू धर्मग्रंथांनुसार ग्रहण काळात मूर्तींना स्पर्श करणे अशुभ मानले जाते. यामुळेच मुंबईतील मंदिरांनी दुपारनंतर दर्शन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमुख मंदिरांच्या बदललेल्या वेळा
दरम्यान, 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे मुंबईतील प्रमुख मंदिरांच्या दर्शन वेळेत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
मुंबादेवी मंदिर: दक्षिण मुंबईतील कुलदेवी मुंबादेवीचे मंदिर केवळ दुपारी 2:00 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील. त्यानंतर दुपारी 2:00 ते संध्याकाळी 7:00 या काळात मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद राहतील. त्यापूर्वी सकाळी 8:00 वाजता विशेष आरती केली जाईल.
सिद्धिविनायक मंदिर: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे दुपारी 3:10 नंतर बंद केले जातील. ग्रहणामुळे नैवेद्य आणि आरतीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
बाबलनाथ मंदिर: प्रसिद्ध श्री बाबलनाथ मंदिर सकाळी 6:00 ते संध्याकाळी 7:00 या कालावधीत दर्शनासाठी बंद असेल. भाविकांच्या सोयीसाठी संध्याकाळी 7:00 ते रात्री 9:00 या वेळेत केवळ मंदिराच्या बाहेरून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाईल.
महालक्ष्मी मंदिर: कोस्टल रोडवरील महालक्ष्मी मंदिरातही ग्रहण संपेपर्यंत सामान्य भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.
भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना
संध्याकाळी 6:47 वाजता ग्रहण सुटल्यानंतर सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता आणि शुद्धीकरण मोहीम राबवली जाईल. मूर्तींना गंगाजलाने स्नान घातल्यानंतरच सायंकाळची आरती केली जाईल. शुद्धीकरण आणि आरती पूर्ण झाल्यानंतरच भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल.
हेही वाचा - Mumbai-Pune New Highway Project : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला नवा पर्याय! 12,000 कोटींचा 'असा' महामार्ग; वाहतूक कोंडीतून मिळणार कायमची सुटका
तथापी, बाबलनाथ मंदिरात संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत बाहेरून दर्शन घेता येईल, मात्र फुले किंवा बेलपत्र अर्पण करण्यास सक्त मनाई असेल. ग्रहणामुळे दर्शनाच्या वेळा बदलल्या असल्याने भाविकांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.