नाशिक: सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याने अक्षरशः कहर केला आहे. नाशिक शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असून, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यावर फिरणाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. दुपारी एक ते चार या काळात उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये त्रास वाढला असून, शासकीय यंत्रणाही आता उपाययोजना करताना दिसत आहेत.
या वाढत्या उष्णतेचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, म्हणून नाशिक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील जवळपास 30 प्रमुख सिग्नल दुपारी 1 ते 4 दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिग्नलवर उभे राहिल्याने लोकांना उन्हात ताटकळावे लागते, त्यामुळे ही काळजी घेतली जात आहे. काही ठिकाणी सिग्नल ब्लिंक मोडवर ठेवण्यात येणार आहेत, म्हणजेच वाहनचालकांनी स्वतः काळजी घेत वाहतूक सुरळीत करावी लागणार आहे.
उन्हाचा फटका टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, टोपी/गॉगल्स/स्कार्फ यांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडूनही करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांच्या या निर्णयामुळे ट्रॅफिक थोडं विस्कळीत होऊ शकतं, मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.