संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदगाव येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. बैलांना धुण्यासाठी आलेल्या तिघांपैकी दोन सक्ख्या चुलत भाव तलावात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे नांदगावात शोककळा पसरली आहे.
नेमकं हा प्रकार कसा घडला?
मृत झालेल्या तरुणांची नावे अखिल शकील पठाण (वय: 18 वर्ष) आणि अहियान पठाण (वय: 18 वर्ष) अशी आहेत. तिघांपैकी दोन भावंड जेव्हा बैल धुण्यासाठी तलावात उतरले, तेव्हा तलावातील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यामुळे ते काहीच क्षणांत तलावात बुडू लागले. ही घटना नांदगाव येथे घडली असून, त्यानिमित्त सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: मोकाट कुत्र्याचा सात वर्षीय चिमुकल्यावर हल्ला
घटनास्थळी मुलीचे धाडस:
घटनेची माहिती मिळताच, तिथे असलेल्या एका 17 वर्षीय धाडसी मुलीने क्षणाचाही विलंब न करता लगेच तलावात उडी मारली आणि तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश मिळवले. 17 वर्षीय मुलीच्या या धाडसामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. मात्र, दुर्दैवाने तलावात बुडून दोघा भावांचा मृत्यू झाल्यामुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.