महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा हवा – खा. उदयनराजे
सातारा: महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी सातत्याने करणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. १२ एप्रिल रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जर अशा कायद्याची घोषणा झाली, तर त्याला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खा. उदयनराजे म्हणाले, “महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा हवाच. या कायद्याची घोषणा १२ एप्रिलला झाली तर आनंदच होईल. मी यापूर्वीही या कायद्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. जर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच ही घोषणा झाली, तर याचे औचित्य आणि परिणाम दोन्ही अत्यंत महत्त्वाचे ठरतील.”
👉👉 हे देखील वाचा : सतीश भोसलेच्या तक्रारीला न्यायालयाने फेटाळले, वकिलांनी मारहाणीचा दावा केला
दरम्यान, संसदेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरही खा. उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “हे विधेयक मंजूर होणे गरजेचे होते. वक्फ बोर्डाने शासनाच्या आणि काही वेळा वैयक्तिक जमिनीही बळकावल्या होत्या. या कायद्यातील काही तरतुदींमुळे लोकांना शासनाकडे न जाता वक्फ बोर्डाकडे दाद मागावी लागत होती. आता या सुधारणा झाल्यामुळे गरीब मुस्लिम समाजाला थेट फायदा होणार आहे. ही एक सकारात्मक आणि गरजेची पावले आहेत.”
छत्रपती उदयनराजे यांनी व्यक्त केलेल्या या दोन्ही मुद्द्यांवरून सामाजिक सलोखा, इतिहासाचा सन्मान आणि गरिबांसाठीचा न्याय या तिन्ही अंगांनी सरकारकडून निर्णय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.