मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यावर किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
अभिनेते महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मराठी माणूस, महाराष्ट्र, मुंबई महानगरपालिका निवडणूक, एकनाथ शिंदेंचे राजकारण, उद्धव ठाकरेंशी युती, भाजपशी जवळीक आदी विषयांवर राज ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या टायमिंगची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राज यांच्या प्रस्तावावर लगोलग भूमिका स्पष्ट केली आहे. दादरमधील शिवाजी महाराज स्मृती मंदिर येथून कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव बोलत होते.
हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar: उन्हामुळे ग्रामीण भागात प्राण्यांची सावलीसाठी धडपड
राज ठाकरे यांनी मुलाखतीत युतीच्या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांनी राज-उद्धव युती करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटवून टाकतो. महाराष्ट्राच्या हितासाठी मतभेद बाजूला करून एकत्र येण्याचे आवाहन करतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पण राज यांनी माझ्यासोबत येऊन की भाजपासोबत जाऊन हित, हे पाहा असेही यावेळी उद्धव म्हणाले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी भांडणं, वाद अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं कठीण नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही असे राज यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे असेही राज म्हणाले आहेत. पुढे बोलताना, आमच्यातली भांडणं छोटी असून महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे. माझी तयारी पण त्यांची आहे का? असा सवाल राज यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. त्यावर सगळी भांडणं मिटवायला तयार असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. आता राज-उद्धव बंधू एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.