Friday, May 16, 2025 01:13:21 PM

राष्ट्रगीत न म्हणता आल्याने भारतीय नागरिकत्वावर शंका; सिंधुदुर्गतील अनधिकृत मदरशावर कारवाईची मागणी

साटेली भेडशी गावातील अनधिकृत मदरशावरून वाद; बांगलादेशी संशयित शिक्षक अटकेत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थ संतप्त.

राष्ट्रगीत न म्हणता आल्याने भारतीय नागरिकत्वावर शंका सिंधुदुर्गतील अनधिकृत मदरशावर कारवाईची मागणी

सिंधुदुर्ग: दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावात अनधिकृतपणे चालवण्यात येणाऱ्या मदरशावरून मोठा वाद उफाळून आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांना न्यायालयात हजर केले असता, 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या गावात अनधिकृत इमारत उभारून मदरसा सुरू करण्यात आला होता. या ठिकाणी शिकवणारा धर्मगुरू हा बिहारमधील असल्याची माहिती दिली जात होती, मात्र त्याच्याजवळ कोणतेही वैध ओळखपत्र किंवा कागदपत्र आढळलेले नाहीत. त्यामुळे तो बांगलादेशी असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले असता संबंधित व्यक्तीला ते म्हणता आले नाही, त्यामुळे तो भारतीय नागरिक नसावा, असा दावा करण्यात येत आहे.

याप्रकरणी गावकऱ्यांनी प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप केला आहे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी वीज व पाणी कनेक्शन त्वरित तोडण्याचे आदेश दिले होते, तसेच इमारत सील करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, अद्यापही इमारत सील करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: गुगल पे देतंय पर्सनल लोन; आता सहज मिळवा 30 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी देखील या परिसरातील काही स्थानिकांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी त्या इमारतीतून तलवारी मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे, ज्यामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती अधिक वाढली आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास, 2018 मध्ये या इमारतीची ग्रामपंचायतीमध्ये महसूल आकारणीसाठी नोंद झाली होती. मात्र, इमारत बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. याशिवाय, गावातील सार्वजनिक रस्त्यांसाठी देखील अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावरही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

सुरेश कौलगेकर या आमच्या सिंधुदुर्ग प्रतिनिधीने गावातील काही ग्रामस्थांशी संवाद साधताना असेही उघड झाले की, या घटनेमुळे संपूर्ण गाव भयग्रस्त आहे. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेऊन इतर संशयित आरोपींना तातडीने ताब्यात घ्यावं आणि इमारत तात्काळ सील करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री