maharashtra weather update today : मुंबईसह 'या' भागात अवकाळी पावसाची शक्यता
maharashtra weather update today : मुंबई : महाराष्ट्रात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने आज अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे तात्पुरता का होईना पण नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. यामुळे पावसाची शक्यात कमी झाली होती. अशात राजस्थान ते विदर्भ दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः किनारपट्टी भागांत तापमानात घसरण झाली आहे. पुढील काही दिवसांत या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा - अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव
विदर्भात उष्णतेची लाट कायम, इतर ठिकाणी पावसाची शक्यता
राज्यातील विदर्भामध्ये मात्र उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत तापमानात थोडीशी घट झाली आहे. या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच अवकाळी पावसाने काही भागांत हजेरी लावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - घरासमोर ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून पती-पत्नीला जबर मारहाण
मुंबईकरांवरिल पाणीकपातीचं संकट टळलं
राज्य सरकारने ऊर्ध्व वैतरणा धरणातून ६८ हजार दशलक्ष लीटर आणि भातसा धरणातून १ लाख १३ हजार दशलक्ष लीटर राखीव पाणीसाठा मुंबईला देण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांवरिल पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने यांची मागणी केली होती. राज्य सरकारनं याला मान्यता दिली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये केवळ ३१ टक्केच पाणीसाठा उरला आहे, त्यामुळे पावसाळा उशिरा सुरू झाल्यास ही राखीव साठवण वापरली जाणार आहे.