Rashmi Thackeray Emotional : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक भावनिक वळण आणले आहे. अनेक वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले असता, तिथे राजकीय संघर्षापेक्षा कौटुंबिक बंधाचीच जास्त चर्चा रंगली.
'मी पक्ष नाही, तर घर सोडलं होतं'; राज ठाकरेंच्या विधानाने रश्मी ठाकरे भावूक
राज ठाकरेंनी आज प्रथमच शिवसेना सोडतानाच्या आपल्या अंतस्थ वेदनांना वाट करून दिली. ते म्हणाले, "20 वर्षांपूर्वी जेव्हा मी बाहेर पडलो, तेव्हाच्या त्या वेदना काही वेगळ्याच होत्या. माझ्यासाठी तो केवळ पक्ष सोडण्याचा निर्णय नव्हता, तर ते घर सोडणे होते." राज ठाकरेंच्या या शब्दांनी सभागृहात शांतता पसरली आणि समोर बसलेल्या रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले. ठाकरे कुटुंबातील हा हळवा क्षण उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा ठरला. तसेच भाषणानंतर रश्मी ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीवेळीही रश्मी ठाकरे पुन्हा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
20 वर्षांचा वनवास संपवा; राज ठाकरेंची साद
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे करत मोठे विधान केले. "गेल्या 20 वर्षांत मलाही अनेक गोष्टी उमजल्या आहेत आणि उद्धवलाही उमजल्या असतील. आता जे झाले ते विसरून जाऊया," असे म्हणत त्यांनी जुने हेवेदावे बाजूला ठेवण्याचे संकेत दिले. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते आणि त्यांच्या पश्चात सुरू असलेले महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे 'गुलामांचा बाजार' असल्याची टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा -
व्यासपीठावर सत्काराचा 'सावळा गोंधळ'
दरम्यान, कार्यक्रमात एक नाट्यमय प्रसंगही घडला. निवेदकाने जेव्हा 'उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज ठाकरेंचा सत्कार होईल' अशी घोषणा केली, तेव्हा राज ठाकरे काहीसे अवघडले. सत्कार करण्यासाठी शाल आणली गेली, पण राज ठाकरेंनी ती संजय राऊत यांच्या हातून स्वीकारली आणि लगेचच स्वतः उद्धव ठाकरेंचा सन्मान केला. दोन भावांमधील हा प्रोटोकॉल आणि आदर पाहून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.