मुंबई: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याचा नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तुरुंग प्रशासनाने त्याने पहाटेच्या सुमारास शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत सुरु करण्यात आली आहे. परंतु, या मृत्यूमागे आत्महत्येचा नाही, तर हत्या झाल्याचा गंभीर आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केला आहे. त्यांच्या मते, विशालला अक्षय शिंदेप्रमाणे मारण्यात आले असून, हा मृत्यू एक ‘खून’ आहे,
गवळीच्या वकिलांनी केलेल्या या दाव्यामुळे तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, विशाल गवळीचे कुटुंबीय तळोजा कारागृहात पोहोचले असून त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. जर ही आत्महत्या नसून खरोखर हत्या असेल, तर तुरुंगातील सुरक्षा यंत्रणेचा गोंधळ उघड होणार आहे. त्यामुळे सरकारवर आणि तुरुंग प्रशासनावर जनतेचा रोष वाढू लागला आहे.
हेही वाचा: कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या
विशाल गवळीच्या मृत्यूची बातमी समजताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एका बाजूला त्यांनी या मृत्यूमुळे थोडे समाधान मिळाल्याचे सांगितले, तर दुसरीकडे त्यांनी सरकारकडून जलदगती न्यायाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली. पीडितेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांनी विशालच्या विरोधात बॅनर्स लावून निषेध व्यक्त केला. शिवसेना माजी शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, जर विशाल गवळीला अटक केल्यानंतर तीन महिन्यांतच फाशी देण्यात आली असती, तर समाजात वचक निर्माण झाला असता. तुरुंगात आत्महत्या झाल्यामुळे आम्हाला आनंद नाही, तर त्याला भर चौकात फाशी दिली गेली असती, तर तीच खरी शिक्षा झाली असती, असे त्यांनी ठामपणे सांगितले.