Tuesday, May 20, 2025 04:26:48 PM

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत; नाशिकच्या बोरीची बारी गावात पाणीटंचाईचं भीषण वास्तव

नाशिकच्या बोरीची बारी गावात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांना विहिरीत उतरून पाणी आणावं लागतं, तर ‘एक टीप’ पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत.

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत नाशिकच्या बोरीची बारी गावात पाणीटंचाईचं भीषण वास्तव

नाशिक: महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केलं असून, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातल्या बोरीची बारी या गावात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवाची बाजी लावावी लागत आहे. इतकंच नाही तर 60 रुपये देऊन नागरिकांना एक ‘टीप’ पाणी विकत घ्यावं लागत आहे.

गावात एकही सुरक्षित पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्यामुळे महिलांना विहिरीत उतरून पाणी काढावं लागतं. अनेकदा दोरीच्या साह्याने पाण्यात उतरणं ही त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. कित्येक वेळा विहिरीत उतरूनही पाणी मिळत नाही. अशा वेळी टँकरचं पाणी विकत घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. आणि त्याची किंमत आहे तब्बल ६० रुपये ‘एक टीप’.

स्थानिक प्रशासनाकडून या भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा केला जातो. मात्र, गावातील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. टँकर वेळेवर पोहोचत नाही, पोहोचला तरी पाणी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आणि ही गर्दी महिलांच्याच शौर्यावर लढवली जाते.

हेही वाचा :महाड शहरासह 22 गावांवर पाणीटंचाईची टांगती तलवार

या टंचाईचा सामाजिक परिणामही स्पष्टपणे दिसून येत आहे. गावातील तरुण मुलांच्या लग्नावरही पाण्याच्या टंचाईचा परिणाम झाला आहे. गावात पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे बाहेरच्या गावातील लोक मुलींना येथे लग्न करून देण्यास टाळाटाळ करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या गावात जवळपास 50 तरुणांचे लग्न कारणामुळे रखडले आहे.

पाणी नाही म्हणून लग्न नाही, अशी वेळ आमच्यावर आलीय. सरकार सांगतं टँकर जातो, पण आमच्या पाड्यांपर्यंत तो कधीच पोहोचत नाही. आणि पाणी मिळालं तरी ते टिकत नाही, असं एका ग्रामस्थाने सांगितलं.

बोरीची बारी गावात पाणीटंचाई ही वर्षानुवर्षांची समस्या आहे. मात्र यंदा परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शासनाच्या अनेक घोषणा कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

या गावातील स्थिती संपूर्ण राज्यासाठी एक इशारा आहे. पाण्याचे व्यवस्थापन, जलसंधारण, विहिरींची सफाई, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा उपाययोजना केवळ फाईलमध्ये न राहता जमिनीवर उतरल्या पाहिजेत. अन्यथा, पाणी हे केवळ जीवन नव्हे, तर नात्यांचंही कारण बनून राहील.


सम्बन्धित सामग्री